त्रिपुरारी पूर्णिमा

 



भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. कार्तिकेयांना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जाते.

कार्तिक महिन्यातील पूर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.  शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.

 त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते. 

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.

दीपोत्सव झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला देशातील काही ठिकाणि देवदिवाळी साजरी केली जाते. तर काही ठिकाणी मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते. काही ठिकाणी या दिवशी बैलांच्या झुंजी लावण्याची चाल आहे. कार्तिक पौर्णिमेला बनारसमध्ये संपूर्ण नगरीला दिव्यांनी सुशोभित केले जाते. गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते.

दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. या दिवशी लक्ष्मी-नारायण पूजन करणे अतिशय शुभ मानले गेले आहे. शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही या दिवशी करणे उत्तम मानले गेले आहे. कार्तिक पौर्णिमेला शक्य असेल, त्यांनी आवर्जुन दीपदान करावे, असे सांगितले जाते. 

प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व असते, परंतु कोजागिरी पौर्णिमे प्रमाणेच कार्तिक पौर्णिमेस सुद्धा अतिशय महत्व आहे. असे म्हटले जाते कि सृष्टीच्या निर्माणा पासूनच कार्तिक पौर्णिमेचे मोठे महत्व राहिले आहे. ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान पुण्य करण्याचे व श्री सत्यनारायण पूजा करून त्याची कथा श्रवण करणे हे अधिक महत्वाचे आहे. ह्या व्यतिरिक्त भगवान श्री शंकर व माता पार्वती ह्यांच्यासह कार्तिकेय व श्रीगणेश ह्यांचे सुद्धा ह्या दिवशी पूजन करणे आवश्यक आहे. शिव परिवारावर मध व दुधाने अभिषेक केला असता अक्षय फल प्राप्ती होते. 

ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पोर्णिमेसह सर्व पौर्णिमेस चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. माता लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी ह्या दिवशी भगवान श्री विष्णुसह माता लक्ष्मी देवीची पूजा करावी. श्रीसूक्त पठण कराव. 

दंतकथा 

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते. त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की, देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. मात्र, तसे झाले नाही आणि शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी शंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली. जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे, हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.

 काही पौराणिक कथांनुसार, श्रीविष्णूंनी यात दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलायापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. अठरा पुराणांमध्ये मत्स्यपुराणाचा समावेश आहे. श्रीविष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले.

त्रिपुरी पूर्णिमे बद्दलची माहिती काही सोशेल साईट वरून संकलित केली आहे आणि तुमच्या सोबत शेयर केली आहे. 





तुळशी विवाह

 


तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी जी एकादशीपासून करायचा पूजोत्सव अशी प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे, म्हणूनच तिला हरिप्रिया असेही म्हंटले जाते व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुलसी व्रत हे एक काम व्रत आहे. तुलसी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लागते .

तुळसीचे पान. एक त्रलोक्य समान, उठोनिया प्रात:काळी, वंदी तुळसी माऊलींनाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही’’अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

हिंदू धर्मा मध्ये तुळशीला पाप – नाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही  भारताच्या सर्व प्रांतात व सर्व प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे. बहुतांश हिंदू कुटुंबीयांच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णू चा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे एक व्रत मांडले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.

विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला ‘प्रबोधोत्सव’ असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुलसी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरुवात होते. 

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे. 

तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची / तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात व तिला छान असे सजवितात. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. 

तुळशीच्या चारी बाजूंनी उसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्री बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशी मातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्य लेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुस-या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वाना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो.  तुळशी जवळ बोर चिंच आवळा सितापळ कांदयाची पात ठेवतात. रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाहय़ा, कुरमुरे, उसाच्या गंडे-या देण्यात येतात. हा विवाह केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. ते व्रत तुलसीवनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले आहे. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे.

तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैवुंâठात जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.

हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असं म्हटलं आहे. ग्रीक भाषेतील ‘बेंझिलिकॉन’ हा तुळशीसंबंधीचा शब्द ‘राजयोग’ या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे, असे मानत असत.

तुळशीची आरती :

जय देव जय देवी जय माये तुळशी ।निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी। ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी।

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।


दंतकथा १ 

तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणात आहे. ती अशी की, जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योद्धा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती.

पुढे, देव व दैत्य यांच्यांत युद्ध होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली.

इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले. वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडलेल. त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.

विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेडय़ासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली.

तुलसी श्री सखी शिवे पाप हरिणी नारायण मनः प्रिये




मसाल्याचा मसला भाग ९ - वेलदोडा


नमस्कार मंडळी मी तुमच्या रोजच्या मिसळण्याच्या डब्ब्यात नसतो पण तुम्ही जो वर्षभराचा गरम मसाला करून ठेवता त्यात मी वेलची आणि मोठी वेलची अगदी आवर्जून उपस्थित असतो. शिवाय कोणत्याही गोड पदार्थात मी आवर्जून घातला जातोच. पाहूया माझी माहिती, स्वयंपाकातील आणि तुमच्या आयुष्यातील माझे महत्व. 

भारतात उगवणारी हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची किंवा एला असेही म्हणतात वेलदोडा हा मसाल्याचा एक प्रकार आहे. ह्याचा वास खूप सुंदर असतो. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायचीनामक प्रकार वापरला जातो.

वनस्पती मूळची भारतातली आहे. सुमारे आठव्या शतकाच्या आसपास वेलदोड्याचा शोध लागला असावा असा एक मतप्रवाह आहे. प्रामुख्याने भारतात व श्रीलंकेत वेलचीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. नेपाळ, ग्वाटेमाला, मेक्सिको, थायलंड व मध्य अमेरिकेतही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.

भारतात फार पूर्वीपासून एला नावाने वेलदोड्याचा वापर केलेला आढळतो. भ्रम उत्पन्न करण्यास वापरलेल्या काढ्यात वेलदोड्याचा उपयोग कौटिलीय अर्थशास्त्रात नमूद केला आहे. संस्कृत काव्यग्रंथांत वेलदोड्याचे उल्लेख आढळतात.

 वेलची हिं. छोटी इलाची गु. इलाची क. येलक्की सं. बहुला, एला, चंद्रबला इं. लेसर अथवा मलबार कार्‌डॅमम लॅ. इलेटॅरिया कार्‌डॅमोमम कुल-सिटॅमिनी, उपकुल-झिंझिबरेसी). वेलदोड्याला इंग्रजीत मसाल्याची राणी (क्वीन ऑफ स्पायसीस) असे नाव आहे व भारताला परकीय चलन मिळवून देणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे मसाल्याचे पीक आहे. ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) औषधीय वनस्पती असून हिचे मूलस्थान व मोठ्या प्रमाणावर लागवड दक्षिण भारतातील सदापर्णी जंगलात आहे. 

मोठा वेलदोडा किंवा मसाल्याचा वेलदोडा (ॲमोमम सुबुलेटम) या जातीची लागवड नेपाळ, बंगाल, सिक्कीम व आसाममध्ये पर्वतातील प्रवाहांच्या कडेने दलदलीच्या जागी करतात.

मोठ्या वेलदोड्याची फळे गर्द लाल-तपकिरी, गोलसर, २·५ सेंमी. लांब असून प्रत्येकात पुष्कळ बिया असतात, त्या साखरेसारख्या गोड दाट गराने एकत्र धरून ठेवलेल्या असतात. याच्या बियांचे वेलदोड्यासारखेच गुणधर्म असतात. त्यांचा मेवामिठाईत उपयोग करतात. उत्तेजक, कडू व रेचक औषधांना स्वाद आणण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. बियांपासून काढलेले तेल पाकणीच्या शोथावर (दाहयुक्त सुजेवर) लावतात.

वेलदोड्याची लागवड बियांपासून तयार केलेली रोपे लावून अथवा जुन्या पिकाच्या गड्‌डयातील ठोंब लावून करतात. रोपे लावून लागवडीची पद्धत सर्वसामान्यपणे वापरात आहे. परंतु वेलदोड्याचे फळ निसर्गात परपरागण [→ परागण] पद्धतीपासूनच तयार होत असल्यामुळे या पद्धतीत एकसारख्या गुणधर्मांची फळे मिळत नाहीत. दुसऱ्या म्हणजे शाकीय पद्धतीत चांगली जोमदार झाडे निवडून त्यांची ठोंबे लावल्यास चांगले उत्पन्न येते आणि रोपे लावून पीक मिळण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा पुष्कळच कमी काळात पीक मिळते. ही पद्धत कमी खर्चाचीही आहे परंतु मोठ्या क्षेत्रावर लावण्यासाठी पुरेशी ठोंबे मिळणे कठीण जाते. शिवाय रोगट ठोंबांतून व्हायरसजन्य रोग पसरण्याची शक्यता असते. शारीरिक अभिवृद्धीच्या पद्धतीने सतत लागवड केल्यास पिकाचा ऱ्हास होण्याचीही शक्यता असते.

नारळ सुपारी बागेत सिंचनाची सोय केलेली असल्याने त्यात वेलदोड्याचे भागते. या पिकासाठी जमीन मात्र उत्तम निच-याची असणे आवश्यक आहे. फुलांच्या तु-यांची ठेवण, फळांचा आकार आणि झाडाची वाढ यावरून मलबार, म्हैसूर, वझुक्का या मूळ तीन जाती प्रमाणित करण्यात आल्या आहेत. आता काही हायब्रीड जातीसुद्धा बाजारात आल्या आहेत. मलबार जातीच्या रोपांची लागवड कमी उंचीवरील प्रदेशात केली जाते. म्हैसूर जातीचे झाड दणकट असून या जातीची लागवड ९०० ते १२०० मीटर उंचीवरच्या प्रदेशात केली जाते. वझुक्का ही जात मलबार व म्हैसूर जातीच्या नैसर्गिक संकरातून निर्माण झाली आहे. केरळ राज्यात याची लागवड केली जाते. नारळी-सुपारीच्या बागेत मिश्रपीक म्हणून व सावलीसाठी सिल्व्हर ओकची लागवड करून वेलदोड्याची स्वतंत्र लागवड करता येते.

फळे काढणीचा प्रमुख हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असतो. तु-यातील सर्व फळे एकावेळी काढणीसाठी तयार होत नाहीत. पूर्ण वाढलेली फळे रसरशीत, फिक्कट पिवळसर हिरवी व चकचकीत असतात. आतील बिया काळ्या असतात. फळे देठांसह अंगठय़ाच्या नखाने किंवा कात्रीने काढावी लागतात. वेलदोड्याची काढणी करताना काळजी न घेतल्यास फळावरून बारीक धागा निघतो व अशी फळे वाळवताना तडकतात. फळे अती पक्व झाल्यास वाळवताना तडकतात व कोवळी काढली तर सुरकुत्या पडतात. सर्वसाधारण बागेतून हेक्टरी शंभर ते १५० हेक्टर उत्पन्न मिळते. लागवडीनंतर १५ वर्षानंतर झाडांचे उत्पन्न कमी होण्यास सुरुवात होते. वेलदोडा उन्हात वाळवला जातो. स्वच्छ सूर्यप्रकाशात चार-पाच दिवसांत वेलदोडा वाळतो. वाळलेला वेलदोडा हवेतील आद्र्रता शोषून घेऊ नये म्हणून हवाबंद डब्यात साठवावा. उन्हात वाळवलेल्या वेलदोड्याचा रंग फिक्कट हिरवा होतो. वाळवताना काळजी न घेतल्यास दाणे ओलसर राहतात. त्यावर बुरशी वाढते.

वेलची एक सुगंधी मसाला आहे. वेलचा स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग गोड पदार्थात चव वाढविण्यासाठी करण्यात येता. तसेच वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते.

तीन वेलची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते.

वेलचीमध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एक वेलची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या.

अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.

वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते.

खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात वेलची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.

कशी वाटली माझी माहिती कॉमेंट मध्ये नक्कीच कळवा आता पुढच्या भागात आपण पाहू चक्री फुलाची माहिती.




कार्तिकी एकादशी



संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादश्या येतात. प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात एक व अधिक मास असल्यास त्या दोन एकादश्या जास्त येतात. कार्तिकी एकादशी व आषाढी एकादशीमध्ये आषाढी एकादशीला जास्त महत्व आहे. आषाढी एकादशीस शायनी व कार्तिक शुद्ध एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.

कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.

पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते. वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी आणि कार्तिकी एकादशांना उपवास करतात.

आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.

आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते.

पंढरपूर मंदिर परिसर 

या दिवशी लोक उपवास करतात. भजन-कीर्तनात दिवस घालवितात. विठ्ठलाची महापूजा करतात.

क्षीरसागरात शयन करत असलेले श्री विष्णूंना उठवून मंगळ कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते.

मंदिर आणि घरामध्ये उसांचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोर, आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो.

 मंडपात शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो.

मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते.

या एकादशीला शालिग्राम, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं.

एकादशीला दिवे प्रज्वलित केले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात.

दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे. आपल्या कुलदैवतांची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्र वाहवीत.

या एकादशीबद्दल एक कथा आहे -

    मृदुमान्य राक्षसाने भगवान शंकरांची भक्तिपूर्वक आराधना केली. त्याचा भक्तिभाव पाहून भोलानाथ शंकर प्रसिद्ध झाले. त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला कि, "तू कोणाकडूनही मारणार नाहीस. पण एका स्त्रीच्या हातून मारशील." असा वर मिळताच या राक्षसाचा मृदू पण नष्ट झाला. त्याने प्रथम देवांचा पराभव केला. परंतु शंकरानेच त्याला वर दिल्यामुळे कोणाचेच काहीच चालले नाही. सर्व देव व भगवान शंकर एका गुहेत लपले. त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव एकादशी होते. तिने मृदुमान्याला ठार मारले. तेव्हा भरपूर पाऊस कोसळला. त्यामुळे देवांची अंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही झालाच.  त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरु झाली. या दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे. आपल्या कुलदैवतांची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्र वाहवीत.

पंढरपूर – हे श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन पण प्रसिध्द आहे.  सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ७२ कि.मी. अंतरावर वसले आहे. पंढरपूर रेल्वे स्थानक मिरज-कुर्डूवाडी-लातूर ह्या रेल्वे मार्गावर आहे.

श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचे ई स ११९५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आले. शहरात इतर हिंदू देवतांचे मंदिरे व अनेक संतांचे मठ (धर्मशाळा) आहेत. पंढरपूर शहर चंद्रभागा (भीमा) नदीच्या काठावर वसले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी व्यतिरिक्त पंढरपुरात १२ महिने नेहमीच महाराष्ट्रातील व लगतच्या राज्यातून असंख्य संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आषाढी व कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात.

विठ्ठल मंदिरात काकडा आरती, महापूजा, महानैविध्य, पोशाख, धुपारती, पाद्यपूजा, शेजारती इत्यादी विविध नित्योपचार केले जातात. मुख्य मंदिरात नामदेव पायरी दरवाजातून प्रदेश करून पश्चिम दरवाजातून मंदिरातून बाहेर पडताना खालील देव देवतांचे दर्शन होते.

!!बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!! 

!!श्री ज्ञानदेव तुकाराम!! 

!!बोला पंढरीनाथ महाराज कि जय!!



उत्सव नात्यांचा पाडवा अन भाऊबीज




दिवाळीच्या माझ्या आठवणी आमच्या श्रीरंग सोसायटीतील बंगल्यापासून सुरु होतात; आई-पपा, आजी-आजोबा,काका-काकी, मी अन माझी छोटी चुलत बहिण दीपा असे एकत्र कुटुंब असल्याने आणि त्यात आम्ही दोघी या सगळ्या मोठ्यांमध्ये लहान असल्याने आमचे खूप खूप लाड होत असत.      आमचे दोघींचे सारे विश्वं आजी- आजोबांच्या भोवतीच फिरायचे. दिवाळीत बंगल्यात कंदील लावणे, दिव्यांच्या माळा  सोडणे. आजी आई अन काकी च्या पाठी पाठी राहून रांगोळीला मदत करणे, आठवड्या आधी पासून भला मोठा फराळाचा घाट आवरलेला पाहणे. त्यातही मध्ये मध्ये करताना खूप मजा यायची. मोठ्या फराळा सोबतच आजी आमच्या साठी भातुकलीचा फराळ सुद्धा करायची. छोटे छोटे लाडू,छोट्या चकल्या, छोटे अनारसे, कानोले आमच्या ताब्यात दिले जात असत. तेच आजी तुळशीच्या लग्नासाठी सांभाळून ठेवायची. आमचा बंगला मोठा असल्याने आणि माझे आजोबा त्यांच्या  भावंडात सगळ्यात मोठे असल्याने खूप सारे सण आमच्या कडेच होत असत. 

धनत्रयोदशीला आम्हा बायकांची तेल उटणे लावून आंघोळ असायची. आजी पाटाखाली रांगोळी काढून त्यावर एकेकीला बसवायची मग ड्रेसला म्याचींग बांगड्या द्यायची. डोक्याला नारळाचे दुध लावायची आणि अंगाला खसखस वाटून तयार केलेले उटणे लावले जायचे; त्यानंतर सगळ्यांसाठी मोती साबण असायचा पण माझ्या साठी मात्र मला आवडता पेअर्स साबण आणायची. प्रत्येकाच्या अंघोळीला पपा अन काका एक-एक लवंगीची माळ वाजवायचे. त्यानंतर आम्ही नवीन कपडे घालून श्रीरंग मधल्या दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचो. संध्याकाळी सर्व आजी-आजोबा सांगतील तशी धनाची पूजा करून धने-गुळाचा नेवेद्य खावून अंगणात फटाके वाजवायला पळायचो. 

दुसरा दिवस तर अजूनच खास असायचा, सगळे मित्र मैत्रिणी ठरवून लवकर कोण उठतो त्याची स्पर्धाच लावली जायची. याशिवाय पपा, काका आणि आजोबा कारीट डाव्या अंगठ्याने कसे तोडतात हे बघयला मला फार मजा यायची आणि अर्धी अंघोळ झाल्यावर ओवाळणीत कोण काय घालते ते बघण्याची एक वेगळीच गंमत होती. सगळे एकत्र फराळाचा आस्वाद घ्यायचो, माझ्या आवडीचे आणि आमचे खास आजीच्या हातचे कानोले तोंडात विरघळून जायचे. आता तसेच कानोले माझी बहिण दीपा अजूनही करते त्या पाठोपाठ आता सगळ्यात धाकटी संज्योतहि सुंदर फराळ करते. आजीच्या खास पदार्थान पैकी अनारसे मात्र नाही जमले कोणालाच. 

त्यानंतर आमची रवानगी अंगणात केली जायची आणि आजी,आई अन काकी लक्ष्मी पूजनाची तयारी करायला लागायच्या. घरातील सोन-नाणे देवापुढे ठेवून आजी लक्ष्मी जप करत पूजा मांडायची. मनोभावे आम्ही सर्वच त्या पूजेत रमून जायचो त्यावेळी आमच्या कडे रेकोर्ड प्लेयर होता. त्यावर ठराविक देवांच्या गाण्यांच्या रेकोर्ड लावल्या जायच्या. एकूणच घरातील वातावरण फार मस्त प्रसन्न असायचे आणि पाहुण्यांची ये-जा तर सततच सुरु रहायची. 

पुढचे दिवस बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीतील पाडवा; या दिवसाची आजीची पूजा पाहण्या सारखी असायची. आजी बळी राजाचे राज्य कणकेने तयार करायची. हत्ती,घोडे,रथ,राजा-राणी अन त्याचे सैन्य पाटावर उभे करून त्याची यथासांग पूजा करायची. त्यावेळी मी आणि दीपा आजीला खूप प्रश्न विचारायचो आणि आज्जी प्रत्येक वेळी त्या बली राजाची गोष्टही सांगायची परंतु तेव्हा त्यातील इतका खोल अर्थ आम्हीत नसे. आता मात्र ते सगळे जसेच्या तसे मला आठवते आहे. 
 
पूजा झाली कि आजी आजोबांना पाटावर बसवून ओवाळणी करायची आणि आजीला त्या दिवशी काहीना काही भेट आजोबा हाती द्यायचेच. तसेच आई-पपा आणि काका-काकी हि करायचे. आम्हाला त्यावेळी इतकी मजा यायची आणि काय चाललेलं आहे याची कुतूहलही असायचे. मी साधारण तिसरी-चौथीत असीन आणि दीपा माझ्या पेक्षा दोन तीन वर्षांनी लहान परंतु त्या सगळ्या गोष्टी ते बंगल्यातील    क्षण मला अजूनही स्पष्ट आठवतायत अगदी आत्ता झाल्या सारखेच. 

पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज, जी कायमच आमच्या बंगल्यात साजरी केली जायची. खूप खूप जण यायचे त्या दिवशी आजीचे तीन भाऊ, माझे मामा, दीपचे मामा, माझे अन दीपाचे भाऊ. पूर्ण बंगला गजबजून जायचा कधी कधी आजोबांच्या बहिणी म्हणजे आमच्या आत्या आज्जी सुद्धा यायच्या. सगळ्यान कडून काय काय भेटवस्तू मिळणार याबद्दल एक वेगळेच आकर्षण असायचे. 

मला माझी भाऊबीज खूप खास वाटायची कारण माझा दादा म्हणजे मावशीचा मुलगा त्याला स्वतःला सख्या तीन बहिणी असूनही खास माझ्यासाठी विरारहून ट्रेन मधून गर्दीतून काहीही करून न चुकता    यायचाच. त्यांनी आणलेल्या गिफ्ट कडे माझे लक्ष कमी आणि तो आवर्जून येतो याचे कौतुक मला जास्त असायचे. 
 
अश्या या दिवाळीच्या लहानपणीच्या आठवणी तुमच्या सोबत शेयर कराव्याश्या वाटल्या. त्या नंतरच्या हि खूप आठवणी आहेतच पण या अगदीच बाल मनातल्या लपून राहिलेल्या आठवणी आहेत यांना वाट मोकळी करावीशी वाटली. 
 

आत्ता पाहूया दिवाळीचा पाडवा अन भाऊबीज याचे मला वेगवेगळ्या सोशल साईट्स वरून मिळालेल्या माहिती एकत्र संकलित करून  लिहिण्याचा हा छोटा प्रयत्न केला आहे. 


दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे बलीप्रतिपदा; या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी (दसरा) हे पूर्ण मुहूर्त असून . साडेतीन मुहुर्तांना ईश्‍वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्त्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात.

आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजअसायची न करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल,अक्षता वाहून त्यांची पूजा होते.

या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले! बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले. बली हा दुष्ट असुर होता, शेतकरी नव्हता.तो राजा होता अन त्याला विष्णूच्या वामन अवताराने मारले शेतकऱ्यांचा राजा बळी आणि श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम; बलराम आणि बळी या दोन शब्दात खूप फरक आहे ल आणि ळ चा बलराम हे शेतकरी लोकांचे प्रतिनिधीत्व करतात त्याची हत्यारेसुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत. म्हणूनच "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे! ती फक्त बळीराजा साठी आहे.

या दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांच्‍या शिंगांना रंग लावून व त्‍यांच्‍या गळ्यात माळा घालून त्‍यांना सजवतात. मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. काही ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत मशाली घेऊन नाच करण्याचीही प्रथा आहे. त्या आनंदोत्सवाचे हे महत्त्वाचे अंग मानले जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.बळीची पूजा करताना जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा व पुढील मंत्राने बळीची प्रार्थना करावी, असे सांगितले आहे –

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो | भविष्येन्द्रासुराराते पूजेयं प्रतिगृह्यताम् ||

अर्थ – विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बळीराजा, तुला नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असूरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर.

त्यानंतर बळीप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात.

पूर्वी, बलिप्रतिपदेच्या पहाटे घरातील एखादी व्यक्तीे सर्व घर झाडून स्वच्छ करी. मग सगळा केर एका टोपलीत जमा करून त्या टोपलीवर जुनी केरसुणी, एक पणती व पैसा-सुपारी ठेवण्यात येई. ती टोपली घरातील प्रत्येक खोलीपुढे ओवाळली जाई. 

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा- फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात व मिरवणूक काढतात. ती पर्वतपूजा केली नाही, तर कार्तिकमासातील सर्व कृत्ये निष्फल होतात, असे सांगितले आहे.



पूर्वी गावागावांमध्‍ये बलिप्रतिपदेच्‍या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्‍ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. 

बलीराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे तीन दिवस आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी, आश्‍विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते अन् धर्माचरण करणार्‍या व्यक्तींच्या घरी लक्ष्मी निवास करते. ‘हे तीन दिवस पृथ्वीवर बलीचे राज्य असेल’, असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला, तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. यावरून भगवंताची ‘तत्त्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व’ हे गुण प्रकर्षाने दिसून येतात.

गोवर्धनपूजा : या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.

आध्यात्मिक महत्त्व : गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्याच्यामध्ये ४ टक्के कृष्णतत्त्व असून श्रीकृष्णाची १० टक्के तारक आणि १० टक्के मारक शक्ती कार्यरत आहे. गोवर्धनपूजनाने एक प्रकारे गोपाळांचा प्रतिपाळ करणार्‍या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.


यावर्षी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे. दिवाळीतील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. 

या वर्षीची दिवाळी जरी आपण सगळ्यांनी थोडक्यातच आवरती घेतली असली तरी पुढच्या दिवाळीची जोरात तयारी आणि प्लानिंग आपण नेहमी प्रमाणे सुरु करूया एका सकारात्मक भावनेने आणि उत्साहाने वाट पाहूया येणाऱ्या दिवाळीची.

या नंतरच्या भागात मी आजीच्या पद्धतीने अन अम्झ्या सासरी केले जाते त्या तुळशी लग्नाची  माहिती लिहिणार आहे. 

आपले अभिप्राय कोमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा







लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया




उत्सव दिपमालेचा 

उत्सव नात्यंचा 

उत्सव आनंदाचा 

उत्सव सौख्याचा 

उत्सव भरभराटीचा 

दिवाळी म्हंटली कि वरील वाक्य हमखास प्रत्येक ठिकाणी वाचायला ऐकायला मिळतात. वर्षभरातील हा पाच दिवसांचा सण तुम्हा आम्हा सर्वांचा खास असतो. अत्यंत उत्सवाने आपण या सणाची वाट पहात असतो. घरातील छोट्या मोठ्या गोष्टी आपण दिवाळीत करू हेच वर्षभर ठरवत राहतो. हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची एक सुंदर लहर घेऊन येतो. प्रत्येक जण आपल्या परिस्थिती नुसार आणि इच्छे नुसार थोड्या किंवा मोठ्या प्रमाणात दिवाळी हा सण न चुकता साजरा करतोच. झगमगते अन  भरभराटीचे हे  पाच दिवस आपल्या मनाला सुखावून जातात. नातेवाईक, घरातील लहान-थोर अन मित्र परिवार यांना भे वस्तू देताना अन त्यांच्या कडून घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हसू खुलत. घरातही एक सकारात्मक उर्जा जाणवते, मानसिक समाधान मिळते. 

या प्रत्येक दिवसचे काही न काही महत्व आहे अन त्याची माहितीही आहेच त्याच सोबत माझ्या आठवणी सुद्धा आहेत. दोन भागात मी सविस्तर माहिती लिहित आहे. आजच्या भागात धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन याची माहिती जी मी संकलित केली आणि त्यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडली तीच तुम्हालाही सांगू इच्छिते.

धनत्रयोदशी 

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपेकी एक असलेल्या दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणार्‍या धनत्रयोदशीने आज दिवाळी पर्वाला प्रारंभ होऊन पुढील ५ दिवस दिवाळी चालते. त्यासाठी धार्मिक परंपरेनुसार घरोघरी पूजेची तयारी करण्यात येते. अश्‍विन महिन्याच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजाअर्चा करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी योग्य मुहूर्त असल्याचे मानले जाते. धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

या शिवाय समुद्र मंथनातून धन्वंतरी या दिवशी अमृतकुंभ घेऊन बाहेर येते, म्हणून या दिवशी धन्वतंरीची देखील पूजा केली जाते.

आज आपण याचं धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्व जाणून घेणार आहोत.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असे ऋषींकडून सांगितले जाते. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू न देण्याचा बेत आखते. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचा जीव वाचतो.म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’.

जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. 

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजा करतात. येथे `धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नि, सूर्य, यांना धनचं म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे (पैशामुळे) अनर्थ घडतो. तसेच या दिवशी लोकं सोने देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नती होते असा समज आहे. जर कुणी सोने खरेदी नाही करू शकले तर ते कुठलीही एखादी वस्तू या दिवशी खरेदी करता. 

आश्विन महिन्यातील शेवटचे तीन दिवस आणि कार्तिक महिन्यातील पहिले दोन दिवस असा पाच दिवसांचा दिवाळीचा उत्सव असतो. शरद ऋतूच्या मध्यभागी येणार हा दीपोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. चौदा वर्षांचा वनवास संपवून, श्रीराम अयोध्येत परतले, तेव्हा प्रजाजनांनी अत्यानंदित होऊन दीपोत्सव साजरा केल्याचे सांगितले जाते. आकाश कंदील आणि फराळ हे दिवाळीचे मुख्य आकर्षण व वैशिष्ट्य असल्याचे म्हटले जाते. 

नरकचतुर्दशी 



आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. यामागील कहाणी अशी आहे की नरकासुर नावाचा असुर मानवांना पीडा देत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्‍याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला वर दिला. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.  

चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा.  

'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।' अर्धी आंघोळ झल्यावर आंघोळ करणार्‍याला औक्षण करावे.

या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी.  त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा.

दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया। चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।'

हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.

नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ब्रह्मांडात संचारत असलेल्या धर्मलहरींना पुष्टता प्रदान करून अवतारी कार्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक अधोगामी लहरींना नष्ट करण्यासाठी समष्टीच्या इच्छाशक्तीचा पुरवठा करून प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करण्यासाठी आवाहन करणे. या माध्यमातून स्वतः धर्मकर्तव्य करून ईश्वराच्या कृपाशीर्वादात्मक लहरींना ग्रहण करता येते.

वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, म्हणजेच धर्माच्या संवर्धनतेच्या माध्यमातून पोषणता प्रदान करून कार्यस्वरूपाच्या जागृतीचे आवाहन करणे. या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते.

यमदीपदान करणे, म्हणजे लयाच्या ऊर्जात्मक आणि चालनात्मक स्वरूपात होणार्‍या युद्धात स्वतःच्या रक्षणासाठी मृत्यूची देवता यम याला त्याचा भाग देऊन अपमृत्यूपासून स्वतःचे रक्षण करणे. या माध्यमातून धर्माला त्याचा हविर्भाग देऊन तृप्त करून आपले समष्टी कर्तव्य करता येते.

कालाय तस्मै नमः’ या कालमहात्म्याचे वर्णन करून कालाच्या माध्यमातून कार्यरत होणार्‍या स्थिरात्मक आणि पुरुषदर्शकात्मक क्रियाशक्तीच्या एका भागाची पूजा करून त्याचे संवर्धन करणे, म्हणजेच कार्यदर्शक स्वरूपात्मकता प्रदान करणे. या माध्यमातून कालमहिमा चित्तावर बिंबवून त्याप्रमाणे आचरण करून उच्च स्तराची अवस्था प्राप्त करून धर्म आचरता येतो.

समष्टीला त्रास देणार्‍या अधोगामी लहरींच्या निर्दालनासाठी जागृत झालेल्या ईश्वराच्या मारक स्वरूपाच्या सगुणतेला पूजेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ईश्वराच्या प्रत्येक कृतीत आपुलकी निर्माण होऊन भाववृद्धी होऊन ईश्वराशी एकरूपता गाठण्याच्या दिशेला वाटचाल होते.

 लक्ष्मीपूजन 

अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.  याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा.

दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वहयांची पुजाअर्चना करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते.

घरातील दागदागीने तिजोरीतुन बाहेर काढुन ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात.

या तीन दिवसांची माहिती या भागात पाहिली पुढच्या भागात पाडवा अन भाऊबीज याबद्दल माहिती अन माझ्या दिवाळी या सणाच्या आठवणी सांगणार आहे. 

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा



वसुबारस

 



दिवाळीची सुरवात वसुबारस या दिवसाने होते हे आपल्या सगळ्यांना नव्याने सांगायची आवशक्यता नाही. या दिवसाचे महत्व आणि माहिती जी मला वेगवेगळ्या सोशल साईटस वरून मिळाली आणि संकलित केली गेली ते आपण पाहूच परंतु माझ्या या दिवसाच्या आठवणी खूपच वेगळ्या आहेत. जेव्हा केव्हा पासून मला दिवाळी समजायला लागली तेव्हा पासून दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व आणि पूजा या बद्दल सुद्धा माहिती संग्रहित  करायला आवडू लागली.

आपल्या सगळ्यांना साधारणपणे दिवाळीच्या आठवणी  शाळेत असल्या पासून ताज्या होतात त्या म्हणजे शाळेतला  दिवाळीचा गृहपाठ, कंदील बनवणे, किल्ला तयार करणे, आणलेले फटाके वाळवणे आणि कपाटात ठेवणे. घरातील झाडलोट, नवीन कपड्यांची खरेदी, नातेवाईकांना भेटवस्तू, घरा समोरील गेरुवरची ठिपक्यांची रांगोळी, त्या रांगोळी करता तयार केलेला कागदही आठवला असेलच. (एक एक इंचावर कागदावर उदबत्तीने भोक पाडून तयार केला जात असे), याशिवाय आजी आणि आई यांच्या सोबत केलेली फराळाची मदत. 

आमच्याकडे फराळाची सुरवात बेसन लाडू आणि रवा लाडूनी व्हायची. त्यानंतर सोयी प्रमाणे पदार्थ केले जायचे परंतु कानोले मात्र वसुबारसाच्या दिवशीच केले जायचे आणि तेही नैवेद्य दाखवल्यावर पहिला कानोला आज्जी माझ्या पपांना खाऊ घालायची. हि प्रथाच झाली होती कारण वसुबारस हि माझ्या पापांची वाढदिवसाची तिथी होती. हिच सवय पुढे आईने सुद्धा चालू ठेवली आणि आई नंतर मी आणि माझ्या बहिणींनी सुद्धा पुढे नेली. आजही या दिवसाची आठवण पपांच्या पानातील कानोल्याचीच असते. काही गोष्टी आपल्या मनावर नकळतपणे खूप खोल रुजून जातात. तसेच या दिवसाचेही आहे. वसुबारस आणि आमच्या सीकेपी लोकांचा फराळाचा राजा कानोल्याचे हे अनोखे नाते मी आजही जपते. असो.....

पाहूया या दिवसाचे महत्व 

भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. 

ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.

 श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस !!!! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.

अये म्हणतात, या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.

उद्या पासून सुरु होणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा



मसला मसाल्यांचा भाग - ८ दालचिनी आणि तमालपत्र





नमस्कार मंडळी मी दालचिनी; आज मी माझ्या बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. 

गरम मसाल्यातील दालचिनीचा आपल्या स्वयंपाकामध्ये आवर्जून वापर केला जातो. भारतीय मसाल्यांमधील दालचिनीला आयुर्वेदामध्येही विशेष असे महत्त्व आहे. पारंपरिक काळापासून दालचिनीचा आणि तमालपत्राचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे. स्वयंपाकघरात वापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळी असते. याच जातीच्या एका वृक्षाच्या वाळवलेल्या पानांना तमालपत्र (हिंदीत तेजपत्ता, Cinnamomum tamala) म्हणतात.याचे इंग्लिशमधील सिनॅमन (Cinnamon) हे नाव ग्रीक भाषेतील सिन्नामोमोन या शब्दापासून आलेले आहे. 

लोक आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या स्वरुपात गरम मसाल्याचा वापर करतात. दालचिनीचे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील फायदे आहेत. यातील औषधी गुणधर्मांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. 

काही जणांना दालचिनीचा चहा पिण्याचीही सवय असते.

दालचिनी हा मुख्यतः श्रीलंका देशात आणि भारतात केरळ राज्यात उगवणारा सदाहरित वृक्ष आहे. दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडूपासारखे असते.पूर्ण वाढलेले झाड ६ ते १५ मी.उंचीचे असते.त्याच्या खोडाची साल निवडून घेऊन वाळवतात.त्यांचा आकार कौलासारखा गोल,जाड,मऊ आणि तांबूस रंगाचा असतो. दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असल्याने अत्यंत सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते. दालचिनी हे बागायती पिक असले तरीदेखील समुद्र सपाटी पासून १००० मी.उंचीवर हे पिक कोठेही घेतले जाते. दालचीनिला सुगंध असतो.यांचा वापर सर्वत्र मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून करतात.याचे तेल ही काढले जाते.

दालचिनीला लवंगानंतर सर्वोत्तम एंटीऑक्सिडेंट मानले जाते. तुम्हाला जाणून आनंद होईल की या मसाल्याचे खूप लांबलचक आणि समृद्ध इतिहास आहे. दालचिनीचे सर्वांत पूर्वीचे वापर जवळपास 2000-2500 ईसापूर्व मधील आढळले आहे. दालचिनीला यहूदी बायबलमध्ये अभिषेकाचे पदार्थ म्हणून नमूद करण्यात आले आणि तिला इजिप्शिअन लोकांनी ममीकरण पद्धतींमध्ये देखील वापरले आहे. रोममध्ये, दालचिनीला अंत्यसंस्काराच्या दरम्यान मृत शरिरांच्या दुर्गंधीला दूर ठेवण्यास वापरले जाई. वास्तविक पाहता, या मसाल्याचे महत्त्व रोममध्ये एवढे होते की केवळ समृद्ध लोक ते वापरू शकत होते.

दालचिनीचे प्रकार: दालचिनीच्या खूप प्रकारच्या प्रजाती असतात, पण सर्वांत सामान्य अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत: 

सिलॉन सिनॅमॉन: ज्याला ट्रू सिनॅमॉन असेही म्हटले जाते. ती सर्वाधिक श्रीलंकेमध्ये पिकते आणि खूप महाग आहे. तिचा सुगंध गोड आणि हलका असतो. सिलॉन सिनॅमॉन एकामेकावर एक पोकळ नळीच्या रूपात एकामेकावर गुंडाळलेल्या पातळ कागदाच्या परतींसारखी दिसते आणि तिचे रंग खूप हलके असते. 

कॅशिआ सिनॅमॉन: उत्पत्तीचे स्थान असल्यामुळे तिला चायनीझ सिनॅमॉन असेही म्हणतात. ते दालचिनीचे सर्वांत सामान्य असे प्रकार आहे. कॅशिआ सिनॅमॉन रंगामध्ये गडद तपकिरी असते आणि तिचा गंध कडक आणि मसालेदार चव असते. या प्रकाराच्या दालचिनीच्या काड्या एकल जाड चादर बनवून एक किंवा दोन्ही बाजूंनी पसरतात. तिचे क्युमॅरिन घटक सिलॉन सिनॅमॉनपेक्षा अधिक असते आणि अधिक प्रमाणामध्ये यकृतासाठी विषारी असते.




दालचिनी चवीला तिखट-गोड असते. दालचिनी उष्ण, दीपन, पाचक, मुत्रल, कफनाशक, स्तंभक गुणधर्माची आहे.मनाची अस्वस्थता कमी करते.यकृताचे (Liver)कार्य सुधारणा करते.स्मरणशक्ती (Memory) वाढवते. 

दालचिनीमध्ये आर्द्रता, प्रथिने (Protien), स्निग्ध पदार्थ,कर्बोदके (Carbo Hydrade), भस्म आढळतात. दालचिनीमध्ये फॉस्फरस (Phosphorus), सोडियम (Sodium), पोटॅशियम (Potassium), थायामीन (Thayamin), रिबोफ्लेविन (Reboflewin), निआसीन (Niasin), ‘अ’ आणि ‘क’ हि जीवनसत्वे ( Vitamin A & C ) आहेत.

दालचिनी उष्ण असलेने उन्हाळ्यात वापर कमी करावा. दालचिनीमुळे पित्त वाढू शकते.

पोटातील गडबडीसाठी, मधुमेहासाठी, वजन कमी करण्यासाठी, जिवाणूरोधी पदार्थ,कॅंडिडा संक्रमणांसाठी, रक्ताभिसरणासाठी दालचिनी अतिशय फायदेकारक ठरते. खोकला आणि पडसे मासिक समस्यांसाठी, मौखिक आरोग्यासाठी, तोंडाच्या गंधासाठी, एक संभाव्य कर्करोगरोधी पदार्थ म्हणून दालचिनी उपयोगी पडते. 

सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर करोना व्हायरसविरोधात लढणं शक्य आहे. दरम्यान करोना व्हायरसवरील उपचारादरम्यान दालचिनीचा सकारात्मक प्रभाव दिसून येत असल्याचे निदर्शनास आलं आहे. करोनाच्या या महामारीमध्ये दालचिनीचा उपयोग जास्त प्रमाणात होत आहे.

दालचिनीमध्ये औषधी गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे घटक आरोग्यासाठी पोषक आहेत. दालचिनीमध्ये अँटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आहेत. हे घटक ऑक्सिडेटिव डॅमेज आणि फ्री रेडिकलपासून आपल्या शरीराचा बचाव करतात. यामध्ये पॉलिफेनॉल्स नावाच्या सर्वात प्रभावी अँटी ऑक्सिडेंटचा समावेश आहे.

 पावसाळ्यात दालचिनीचे सेवन आवर्जून करावे. कारण या दिवसांमध्ये बॅक्टेरिअल आणि फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. दालचिनीमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपल्या शरीराचा संसर्गापासून बचाव करतात.

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी दालचिनीचे सेवन करणं लाभदायक ठरते. दालचिनीमुळे शरीरातील रक्त शर्करा आणि इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहण्यास बरीच मदत मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दालचिनीचे सेवन केल्यास मधुमेहाचा त्रास कमी होऊ शकेल.

मेंदूशी संबंधित आजारांना न्यूरोडोजेनेरेटिव्ह (Neurodegenerative diseases) या नावानंही ओळखले जाते. नियमित योग्य प्रमाणात दालचिनीचे सेवन करणाऱ्यांना या आजाराचा धोका कमी असतो. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. दालचिनीमधील औषधी गुणधर्म मेंदूमध्ये टाउ (Tau) नावाचं प्रोटीन तयार होण्यापासून रोखण्याचं कार्य करतात. या घटकामुळे अल्झायमर आजार होण्याची भीती असते. दरम्यान दालचिनीच्या सेवनामुळे मेंदूची कार्यप्रणाली जलदगतीने पार पडते, अशी माहिती अभ्यासाद्वारे समोर आली आहे.

 भारतामध्ये दरवर्षी हजारो नागरिक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, बदलती जीवनशैली, व्यायाम न करणे यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. दालचिनीचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राहते आणि हृदयविकारांचा धोका कित्येक पटीनं कमी होऊ शकतो, अशी माहिती एका वैद्यकीय चाचणीदरम्यान निदर्शनास आली आहे. हृदयविकाराचे धोके टाळण्यासाठी आहारामध्ये दालचिनीचा समावेश करावा.




तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते.

याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे.

तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा तमालपत्राचा प्रभाव सकारात्मक दिसून येत आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना  अधिक लाभदायक आहे.  

रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्राशन करावे.  

तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन पिणे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.  

तर मित्रांनो कशी वाटली मी, आहे की नाही आहारात उपयुक्त आणि तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर. 

पुढचा नंबर वेलदोड्याचा...



मसला मसाल्याचा भाग - ७ काळीमिरी


नमस्कार मित्र हो मी मिरी मी बहुवर्षायू वेल पायपरेसी कुलातील असून माझे शास्त्रीय नाव पायपर नायग्रम आहे. आज मी तुम्हाला माझी माहिती आणि  माझे औषधी गुणधर्म तुम्हाला सांगणार आहे.   

काळी मिरीला मसाल्याचा राजा असे संबोधले जाते. काळी मिरी जगप्रसिद्ध भारतीय मसाल्यांपैकी एक आहे आणि भारतीय आहारात तिचा आवर्जून वापर केला जातो. असे कोणतेही घर आढळणार नाही ज्यांच्या आहारात गरजेनुसर काळी मिरी वापरत नाही. अनेक स्वादिष्ट भाज्या आणि पदार्थ बनवताना जर त्यात काळी मिरी टाकली नाही तर त्या पदार्थाची चव कुठे ना कुठे कमी राहते. आहारशास्त्रानुसार असेही सांगितले जाते की काळी मिरी हि फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे.

भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्‍कृष्‍ट दर्जा असल्‍यामुळे जाग‍तिक काळी मिरीच्‍या ९०टक्‍के निर्यात एकटया भारतातून होते. तसेच भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणा-या एकुण परकीय चलनापैकी ७० टक्‍के परकीय चलन एकटया काळ्या मिरीपासून मिळते. मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जाते.

जगात मिऱ्याची लागवड करणाऱ्या देशात भारत, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील व श्रीलंका हे प्रमुख आहेत. पैकी भारताचा प्रथम क्रमांक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी इंडोनेशियात मिऱ्याचे सर्वांत जास्त उत्पादन होत असे परंतु युद्धामुळे तेथील मळे उद्‌ध्वस्त होऊन उत्पादन निम्म्याने घटले.

भारतात उत्‍पादन होणा-या एकूण काळी मिरीपैकी ९८ टक्‍के उत्‍पादन एकटया केरळ राज्‍यात होते. त्‍या खालोखाल कर्नाटक व तामिळनाडुचा क्रमांक लागतो. महाराष्‍ट्रातील कोकण विभागात तुरळक मिरी लागवड आढळते. कोकण किनारपटटीतील हवामान या पिकाच्‍या लागवडीस अनुकूल असल्‍याने आणि काळी मिरीच्‍या वेलास आधाराची आवश्‍यकता असल्‍यामुळे सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या नारळ, सुपारीच्या  झाडांवर वेल चढवून मिरी लागवड करता येते. परसा बागेतील आंबा फणस यासारख्‍या कोणत्‍याही झाडावर वेल चढवून मिरी लागवड करता येते. त्‍यामुळे घरातील सांडपाण्‍याचा योग्‍य उपयोगही केला जातो आणि घरातील काळी मिरीची गरज भागवून आपल्‍या काही प्रमाणात बाजारातही काळी मिरी विकता येईल आणि त्‍यातुन आर्थिक फायदासुध्‍दा होईल. नारळ सुपारीच्‍या बागा नसतील परंतु पाण्‍याची सोय असेल अशा ठिकाणी पानमळयाच्‍या धर्तीवर पांगारा लागवड करुन त्‍यावरही स्‍वतंत्रपणे मिरी वेल लावून उत्‍पन्‍न घेता येईल.

घराच्या किंवा कंपाऊंडच्या भिंती खरखरीत असतील तर भिंतीच्या पूर्वेकडील बाजूवर २-२ मीटर अंतरावर एका ओळीत मिरवेलीची लागवड करून वेलींना भिंतीवर सोडता येते. आधाराच्या झाडापासून ३० ते ४० सें. मी. अंतरावर मिरवेलीची लागवड शक्यतोवर जून महिन्याच्या तिस-या आठवडय़ापूर्वी करावी आणि वेलींना काठय़ांचा आधार न चुकता द्यावा. काठीचे एक टोक वेलीच्या बुंध्याजवळ जमिनीत दीड-दोन सेमी खोल घुसवावे व दुसरे टोक बुंध्यावर टेकवून ठेवावे. काठी सरकू नये म्हणून सुतळीने खोडावर घट्ट बांधावी. या काठीवर मिरवेल ज्युटच्या सुतळीने बांधावी. प्लास्टिकची सुतळी वापरू नये. मिरवेल वाढत जाऊन आधाराच्या झाडावर चढेल. त्यावेळी ती आधाराच्या झाडाच्या खोडावर सुतळीने बांधावी.

काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे- जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात. हिरव्या घडातील एक- दोन दाण्यांचा रंग पिवळा अगर नारिंगी होताच घड तोडावेत, नंतर त्या घडातील मिरीचे दाणे हातांनी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढीग उन्हात वाळवावेत. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात. हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करंडीत गोळा करावे लागतात  किंवा पातळ फडक्‍यात गुंडाळावे लागतात. त्यानंतर एका स्वतंत्र भांड्यात पाणी उकळत ठेवतात.

पाण्याला उकळी येण्यास सुरवात झाल्यानंतर ती करंडी अगर फडक्‍यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात सुमारे एक मिनीट बुडवून काढतात. अशा रीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके अंथरूण त्यावर वाळत ठेवावी लागते. या पद्धतीचे फायदे म्हणजे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो. बुरशी लागत नाही. मिरीची प्रत सुधारते. पन्नीयूर- 1 या जातीच्या वेलापासून सरासरी पाच ते सहा किलो हिरवी मिरी मिळते आणि ही मिरी वाळविल्यानंतर दीड ते दोन किलो होते. 



सर्दी, खोकल्याने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी काळी मिरी अतिशय उपयुक्त उपाय ठरते. आयुर्वेदात काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी आणि खोकला ठीक होऊ शकतो सेही सांगितले गेले आहे. म्हणून ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या आहे त्यांनी मधासोबत काळ्या मिरीच्या पावडरचे सेवन करावे. 

ती सुवासिक व उत्तेजक म्हणून तसेच तापानंतरचा थकवा, भोवळ येणे व बेशुद्धी येणे यांवर वापरतात. ती तिखट, उष्ण व कृमिनाशक असून कफ, वात, दमा, घशाचे विकार, रक्त पडणारी मूळव्याध, नाकातील दुर्गंधी व रातांधळेपणा यांवर उपयोगी  आहे.

मिरीच्या फळात पायपेरीन, पायपेरिडीन आणि बाष्पनशील तेले आहेत. संशोधनाने असे सिद्ध झाले आहे की, पायपेरीनमुळे शरीरात सेलेनियम, ब-समूह जीवनसत्त्वे, बीटा-कॅरोटीन (पूर्वगामी अ-जीवनसत्त्व) आणि करक्युमीन यांचे शोषण व्हायला मदत होते. 

सध्या कोरोनाचे संकट आपल्यावर कोसळले आहे. कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर रोगप्रतिकार शक्ती मजबूत असायला हवी हे आपण ऐकत आलो आहोत. सध्या कोरोना बाधितांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्यांना कोरोनामुक्त करण्यासठी हॉस्पिटलमध्ये जो काढा दिला जातो त्यातही काळ्या मिरीचा वापर केलेला असतो. विश्वास बसत नसेल तर तुम्ही पुष्टी करू शकता. कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासठी काळ्या मिरीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. इतरही अनेक आजारांशी लढण्याकरता रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची असते त्यामुळे आवर्जून काळ्या मिरीचा वापर करा. गरम पाण्यात उकळवून सुद्धा तुम्ही त्या पाण्याचे सेवन करू शकता.

कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित करण्याचा गुणधर्म सुद्ध काळ्या मिरीमध्ये आढळतो. हा गुणधर्म हृदय रोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतो. याशिवाय काळ्या मिरीमध्ये असलेली कार्डियोप्रोटेक्टिव एक्टिविटी सुद्धा हृदयाशी निगडीत गंभीर आजारांचा धोका अतिशय कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. काळ्या मिरीचे सेवन करण्यासाठी तुम्ही काळ्या मिरीच्या पावडरला गरम पाण्यात उकळवून मधासह प्या. हृदय रोगाची समस्या असणाऱ्यांनी अवश्य काळ्या मिरीचे सेवन करा.

रक्तातील सारखेचा स्तर नियंत्रित ठेवण्याचा सर्वाधिक फायदा मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी होतो. दरवर्षी मधुमेहामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. मात्र काळ्या मिरीचे जर नियमित रूपाने सेवन केले तर रक्तातील साखर नियंत्रित होते. त्यामुळे मधुमेहाचा धोका सुद्धा कमी होतो. तुमच्या आसपास वा ओळखीचा कोणी मधुमेहाच रुग्ण असेल तर त्याला आवर्जून काळ्या मिरीचा ग गुणधर्म सांगा आणि काळ्या मिरीचे सेवन करण्याचा आवर्जून सल्ला द्या.

कधी कधी आपल्या शरीरात अचानक सूज निर्माण होते आणि हि सूज दूर करण्यात काळी मिरी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. खासकरून ज्या लोकांना अर्थराइटिसची समस्या आहे त्यांनी प्रामुख्याने काळ्या मिरीचे सेवन करायला हवे. यामागचे वैज्ञानिक कारण हे आहे कि काळ्या मिरीमध्ये सुज विरोधी गुणधर्म असतात आणि या कारणामुळे शरीरात होणारी विविध प्रकारची सूज नि विशेषत: श्वसन नलिकेमध्ये अस्थमाच्या कारणामुळे होणारी सूज दूर करण्यात सुद्धा काळी मिरी रामबाण ठरते. 

तर मित्रांनो असामी मसाल्यांचा राजा कसा वाटलो नक्की सांगा आणि उद्या आपण ऐकणार आहोत माहिती दालचिनीची 




मसाल्याचा मसला भाग - ६ लवंग

 


 गरम मसाल्याच्या ग्रुप मधली मी अतिशय महत्वाची आणि औषधी गुणधर्म असलेली अस्सल ठसकेबाज लवंग. माझ्याच नावाने ओळखिली जाणारी लवंगी मिरची पण असते. अत्यंत तडाखेबाज व्यक्तिमत्व आहे माझे; तर पाहूया माझी माहिती आणि फायदे.

लवंग हे एक पीक अतिशय महत्‍वाचे स्‍थान असलेले किंमती पीक आहे. भारतात प्रामुख्‍याने हे पीक केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्‍यात घेतले जाते. लवंगाचा उपयोग अन्‍न पदार्थांना स्‍वाद व चव देण्‍यासाठी तसेच अनेक प्रकारच्‍या औद्योगिक उत्‍पादनात लवंग तेलाचा उपयोग होतो. टूथपेस्‍ट, दातदुखी वरील औषधे, पोटातील विकारांवर औषधे तसेच उत्‍तम प्रतीची अत्‍तरे सुवासिक साबण व व्‍हॅनिला तयार करण्‍यासाठी लवंग तेलाचा उपयोग होतो. लवंगापासून साधारण  १५ ते १७ टक्‍के तेल मिळते.

हवामानातील साधर्म्‍यामुळे केरळ प्रमाणेच महाराष्‍ट्रातील कोकण विभागात लवंग लागवडीस चांगलाच वाव आहे. कोकण कृषि विद्यापीठाने विद्यापिठांतर्गत असणा-या विविध संशोधन केंद्रावर लवंगेची लागवड केली जाते आणि त्‍यामध्‍ये पिकांची वाढ व उत्‍पन्‍न समाधानकारक असल्‍याचे दाखवून दिले आहे. 

उंच व सदापर्णी वृक्षाचे मूलस्थान इंडोनेशियातील मोलकाझ (मोलूकू) बेटे हे असून मलेशियातील काही बेटांवरही तो आढळतो. त्याची लागवड श्रीलंका, इंडोनेशिया, मॅलॅगॅसी, झांझिबार, पेंबा (टांझनिया), सेशेल्झ बेटे, पिनँग, रेयूर्न्यो बेट, मॉरिशस व वेस्ट इंडीज येथे केलेली आहे. भारतात तमिळनाडूत (निलगिरी, तिरूनेलवेली व कन्याकुमारी जिल्ह्यात) आणि केरळमध्ये (कोट्ट्यम्, एर्नाकुलम, व त्रिवेंद्रम जिल्ह्यात) लवंग वृक्ष लागवडीत आहेत. लवंगेचा अंतर्भाव पूर्वी यूजेनिया प्रजातीत करण्यात येत असे परंतु आता तसा करीत नाहीत तथापि आद्याप यूजेनिया कॅरिओफायलाटा, कॅरिओफायलस ॲरोमॅटिक्स, मिर्टस कॅरिओफायलस इ. नावे पाठ्यपुस्तकात लवंगेकरिता वापरलेली आढळतात. रामायण, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व महाकवी कालिदासाच्या संस्कृत काव्यात व नाटकात लवंगेचा उल्लेख आढळतो. चीनमध्ये इ. स. पू. तिसऱ्या शतकात ती उपयोगात होती. जावातून चीनच्या हान दरबारात लवंग आणली गेली बादशाहाशी बोलताना आपला श्वास (मुख) सुगंधित करण्यासाठी लवंग तोंडात ठेवण्याची चिनी लोकांची रीत असे.रोमन लोकांना तिची माहिती होती. प्राचीन काळी चिनी लोकांचा भारत व अँवोइना येथे लवंगांचा व्यापार होता.

लवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी भरलेले सदाहरित असते. उंची १२-१३ मीटर असते. खोडाची साल पिवळट, धुरकट, तसेच कोवळी असते. या झाडाचे बुंध्याला चारही बाजूला कोवळ्या व खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. याची पाने मोठी व अंडाकार असतात. लवंगाचे फुल निळसर तांबडे असते. तेच वाळून लवंग म्हणून बाजारात आणतात. याला साधारण नऊ वर्षांनी फुले येतात.लवंग हि स्वयपाकात व मसाल्यात वापरले जातात.



हि. लौंग सं. लवंग, देवकुसुम इं. क्कोव्ह लॅ. सायझिजियम ॲरोमॅटिकम, यूजेनिया कॅरिओफायलाटा कुल-मिर्टेसी). हे नाव लवंग या नावाने ओळखल्या जातात.

आपण मसाल्‍यात वापरतो ती लवंग म्‍हणजे लवंगाच्‍या झाडावरची कळी होय. पुर्ण वाढलेल्‍या कळया काढुन उन्‍हात वाळविल्‍या की, लवंग तयार होते. परंतु त्‍या तशाच वाढू दिल्‍यास त्‍यांचे फूलांमध्‍ये रूपांतर होते आणि नंतर फळात म्‍हणजेच एका कळीपासून एक लवंग किंवा एक फळ तयार होते.


भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच. लवंग हा असाच एक मसाल्याचा औषधी पदार्थ. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे...

डोके दुखत असल्यास लवंगाचा लेप लावतात. 

मुखरोगात लवंग तोंडात धरून चघळावी. 

दम, खोकला, आम्लपित्त यांवर लवंगाचा उपयोग होतो. 

खोकला व सर्दी यांवर लवंगाचा काढा करून त्यात मध घालून दयावा. कफ  मोकळा होतो. 

लवंगापासून लवंगादी वटी , लवंगोदक, लवंगादी चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण ही औषधे बनवतात. 

लवंगाचा उपयोग जेवणात, मसाल्याच्या पदार्थात, साखर भात तयार करताना, 

विडा लावताना केला जातो. अशा या बहुगुणी लवंगाची लागवड मलाया, सैलिबीस बेटांवर मोठ्या प्रमाणात केली जाते. 

 वैद्यकात लवंगेचा वापर पुरातन आहे. ती सुगंधी, उत्तेजक व वायुनाशक असल्याने जठरातील दाहावर आणि अग्निमांद्यावर (भूक वाढविण्यास) देतात मलमळ, शिसारी, वांती आणि उदरवायू यांसारख्या तक्रारींवर लवंगेची पूड किंवा फांट (पाण्यात काढलेला रस) देतात. 

अतिसंवेदनाशील दंतिन (दातातील अस्थीसारखा पेशीसमूह) व किडक्या दातातील पोकळ्या यांना स्थानिक बधिरता आणण्यास तेल वापरतात. झिंक ऑक्साइड व लवंग तेल यांचे मिश्रण दातांतील पोकळ्यांत भरतात. 

तेल बाहेरून लावल्यास कातडी लाल होते. पोटात घेतल्यास वायुसारक व आकडी बंद करण्यास उपयुक्त असते. लवंग स्तंभक (आकुचंन करणारी), जंतुनाशक, कीटकनासक, पूतिरोधक (सूक्ष्मजीवांचा नाश करणारी ) असते.  

मळमळ व उलटी होणे, तसेच पोटाच्या तक्रारीवर तिची पूड किंवा रस देतात.  

स्वयंपाकात स्वादासाठी लवंग किंवा तिची पूड वापरतात. 

लवंग तेल किडलेल्या दाताला बधिरता आणण्यासाठी वापरले जाते. 

दंतधावने, गुळण्या करण्याचे पदार्थ, च्युईंग गम, साबण, सौंदर्यप्रसाधने, गरम पेये, तेले आणि अत्तरे यांतदेखील लवंग तेल वापरतात.


अशी मी मसाल्यांच्या डब्यातील महत्वाची आहेच आणि माझे औषधी गुणधर्म फारच उपयोगी आहेत. उद्या पाहू काळी मिरीची माहिती आणि फायदे. 


मसला मसाल्याचा भाग - ५ धणे

 



गरम मसाल्याच्या पदार्थांमधील महत्वाचा घटक म्हणजे धने. स्वयंपाक घरात धन्यांना विशेष स्थान आहे. रोजच्या स्वयंपाकात धने आवर्जुन वापरले जातात. आमटी किंवा भाजीत धने हमखास टाकले जातात. आपण भारतीय वर्षानुवर्षापासुन धन्याचा वापर स्वयंपाक घरात व तसेच औषधासाठी उपयोग करून घेत आहोत. औषधी व अन्न पदार्थांसह धने पुजेसाठीही वापरले जातात. भारतात अनेक ठिकाणी धने शुभ मानले जातात व त्यांचा पुजेच्या ताटात इतर साहित्यासोबत समावेश केला जातो. अनेक ठिकाणी शुभकार्यात शुभ मुहुर्त किंवा शुभ शकुन म्हणुन गुळ व धने वाटण्याची पद्धत आहे.

धण्याला लॅटिनमध्ये अंब्रेली फेरी, इंग्रजीत कोरिअँडर, संस्कृत भाषेत धान्यक किंवा धन्यक व मराठीत धने, धन्या, धनिया, कोथिंबिर इत्यादी नावे आहेत.

हे एक मसाल्याचे झाड आहे. धन्यांची माहिती युरोपखंडात फार प्राचीन कालापासून आहे. हिंदुस्थानातून मसाल्याचे जिन्नस ईजिप्‍तमध्ये गेल्या शतकापर्यंत रवाना होत. परंतु हल्ली कोथिंबीरीची लागवड रशिया, हंगेरी, हॉलंड, बोरक्को इत्यादी देशांत झाल्यामुळे आता ते हिंदुस्थानातून ईजिप्‍तला रवाना होत नाहीत.

हिंदुस्थानात निरनिराळ्या प्रांतांत याची लागवड निरनिराळ्या वेळी करितात. व ती बहुधा मिश्रपीक म्हणून केली जाते. बंगाल व संयुक्त प्रांत यामध्ये हिवाळ्यात मुंबईप्रांतात पावसाळ्यात व मद्रास इलाख्यात शरद ऋतूत याची लागवड करतात. नेपाळमध्ये धन्याचे मोठे उत्पन्न होते. पंजाबांतहि याची लागवड प्रत्येक जिल्ह्यांत आहे. कोथिंबिरीच्या पानांचा भाजीत, कढीत स्वाद येण्याकरिता व धन्याचा उपयोग मसाल्यांत करितात. 

गावरानी धान्याचा दाणा लहान व काळसर असतो. बदामी धन्याचा दाणा गावरानीपेक्षा दुप्पट मोठा व पिवळा असतो. बदामी धन्यास जास्त दिवस स्वाद राहतो; दुय्यम पिकाकरिता गावरानी बी वापरतात. धन्याकरिता कोरडवाहू शेतात हळवे व गरवे अशी दोन्ही पिके शेकडो एकर करतात. धन्याचे उत्पन्नही चांगले होते.

कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्‍यात केली जाते. कोथिंबीरीच्‍या विशिष्‍ट स्‍वादयुक्‍त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. मात्र कोथिंबीरीची लागवड प्रामुख्‍याने खरीप आणि रब्‍बी हंगामात केली जाते. उन्‍हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्‍पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. त्‍यामुळे कोथिंबीरीच्‍या लागवडीस चांगला वाव आहे. कोथिंबीर ही रोजच्‍या आहारात वापरली जाणारी महत्‍वाची पालेभाजी आहे. कोथिंबीरीच्‍या विशिष्‍ठ स्‍वादयुक्‍त पानावर इतर भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी शाकाहारी तरी मांसाहारी पदार्थामध्‍ये कोथिंबीरीचा वापर करण्‍यात येतो. कोथिंबीरीच्‍या वडया चटणी आणि कोशिंबीर लोकप्रिय आहे.

उष्ण गुणाचे असून पाचक, अन्नाची रूची वाढवणारे, लघवी साफ करणारे, पित्ताचे सर्व विकार, अम्लपित्त, शरीरातील पित्त वाढल्याने येणारा ताप, जुलाब, शरीरातील काही विशिष्ट जंत यावर उपयोगी आहे. अनेक गृहिणी आपल्या स्वयंपाक घरात धणेव जिरे बारीक करून एकत्र पावडर तयार करून ठेवतात व भाजीत किंवा आमटीत वापरतात.

धणे व जिरे-

धने व जिरे समप्रमाणात घेऊन बारीक करून त्याचा मसाला बनवण्यात येतो. हा मसाला प्रत्येक भाजीत वापरता येतो. धनेजिरे पावडर शरीरातील पित्त कमी करते व पाचक, रूचिवर्धक आहे. पित्ताचे सर्व आजार व शरीरात वाढलेली उष्णता यावर ही धनेजिऱ्याची पावडर खूप गुणकारी आहे.

अर्धा चमचा धने, एक कप दूध व अर्धा चमचा साखर उकळून रोज सकाळी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते व पचनक्रिया सुधारते.

वारंवार तहान लागत असल्यास धन्याचा खूप चांगला फायदा होतो. रात्री एक ग्लास पाण्यात दोन चमचे धने भिजवावे व सकाळी कुस्करून पाणी गाळून घ्यावे व ह्या पाण्यात साखर व मध घालून थोड्या थोड्या वेळाने प्यावे.

तापात रूग्णाच्या शरीरात उष्णता वाढल्याने वारंवार तहान लागते. अश्यावेळी धने, साखर व काळे मनुका पाण्यात भिजत ठेवावे व ७-८ तासाने चांगले कुस्करून गाळून हे पाणी घोट घोट प्यावे. मधुमेहाच्या रूग्णांनी फक्त मनुका व धन्याचं पाणी प्यावे साखर टाळावी.

शरीरात अतिरिक्त उष्णता वाढलेली असतांना रात्री पाण्यात धने भिजवावे व सकाळी कुस्करून हे पाणी रोज प्यावे शरीरातील उष्णता कमी होते.

ज्यांना लघवीला त्रास होत आहे व अडकून अडकून लघवीला होत आहे अश्यांनी रोज सकाळी धन्याचा काढा प्यावा. काढ्या प्यायल्याने लघवी साफ होते. तसेच धने व गोखरूचा काढा तूप टाकून प्यावा. लघवी संबंधीतील तक्रारी कमी होतात.

धणे रुचीवर्धक व मूत्रल असतात. तोंडाची अरुची नाहीशी करण्यासाठी कोथींबीरिची चटणी खातात, त्याने चांगली भुकही लागते.

खोकल्यावर धणे हे अप्रतिम ओषध आहे.त्यासाठी धणे व ज्येष्ठमध यांचा काढा घ्यावा.

धणे कृमिनाशक असून लहान मुलांना जंत किंवा कृमी यांचा त्रास होत असल्यास त्यांना धणे व साखर खावी,त्याने पित्त शमते.

शौचस पातळ व आमयुक्त होत असल्यास धण्याचा काढा घ्यावा. आमांश बरा होतो .

धणे लोह युक्त असतात.

तर असा मी कोथिंबीर आणि धणे त्या दोन्ही रुपात तुमच्या रोजच्या आहारात उपयोगी पडतो. याशिवाय माझे अनेक मित्र आहेत. पुढच्या भागात पाहू लवंगी चे फायदे आणि महत्व.



संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...