उत्सव नात्यांचा पाडवा अन भाऊबीज




दिवाळीच्या माझ्या आठवणी आमच्या श्रीरंग सोसायटीतील बंगल्यापासून सुरु होतात; आई-पपा, आजी-आजोबा,काका-काकी, मी अन माझी छोटी चुलत बहिण दीपा असे एकत्र कुटुंब असल्याने आणि त्यात आम्ही दोघी या सगळ्या मोठ्यांमध्ये लहान असल्याने आमचे खूप खूप लाड होत असत.      आमचे दोघींचे सारे विश्वं आजी- आजोबांच्या भोवतीच फिरायचे. दिवाळीत बंगल्यात कंदील लावणे, दिव्यांच्या माळा  सोडणे. आजी आई अन काकी च्या पाठी पाठी राहून रांगोळीला मदत करणे, आठवड्या आधी पासून भला मोठा फराळाचा घाट आवरलेला पाहणे. त्यातही मध्ये मध्ये करताना खूप मजा यायची. मोठ्या फराळा सोबतच आजी आमच्या साठी भातुकलीचा फराळ सुद्धा करायची. छोटे छोटे लाडू,छोट्या चकल्या, छोटे अनारसे, कानोले आमच्या ताब्यात दिले जात असत. तेच आजी तुळशीच्या लग्नासाठी सांभाळून ठेवायची. आमचा बंगला मोठा असल्याने आणि माझे आजोबा त्यांच्या  भावंडात सगळ्यात मोठे असल्याने खूप सारे सण आमच्या कडेच होत असत. 

धनत्रयोदशीला आम्हा बायकांची तेल उटणे लावून आंघोळ असायची. आजी पाटाखाली रांगोळी काढून त्यावर एकेकीला बसवायची मग ड्रेसला म्याचींग बांगड्या द्यायची. डोक्याला नारळाचे दुध लावायची आणि अंगाला खसखस वाटून तयार केलेले उटणे लावले जायचे; त्यानंतर सगळ्यांसाठी मोती साबण असायचा पण माझ्या साठी मात्र मला आवडता पेअर्स साबण आणायची. प्रत्येकाच्या अंघोळीला पपा अन काका एक-एक लवंगीची माळ वाजवायचे. त्यानंतर आम्ही नवीन कपडे घालून श्रीरंग मधल्या दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचो. संध्याकाळी सर्व आजी-आजोबा सांगतील तशी धनाची पूजा करून धने-गुळाचा नेवेद्य खावून अंगणात फटाके वाजवायला पळायचो. 

दुसरा दिवस तर अजूनच खास असायचा, सगळे मित्र मैत्रिणी ठरवून लवकर कोण उठतो त्याची स्पर्धाच लावली जायची. याशिवाय पपा, काका आणि आजोबा कारीट डाव्या अंगठ्याने कसे तोडतात हे बघयला मला फार मजा यायची आणि अर्धी अंघोळ झाल्यावर ओवाळणीत कोण काय घालते ते बघण्याची एक वेगळीच गंमत होती. सगळे एकत्र फराळाचा आस्वाद घ्यायचो, माझ्या आवडीचे आणि आमचे खास आजीच्या हातचे कानोले तोंडात विरघळून जायचे. आता तसेच कानोले माझी बहिण दीपा अजूनही करते त्या पाठोपाठ आता सगळ्यात धाकटी संज्योतहि सुंदर फराळ करते. आजीच्या खास पदार्थान पैकी अनारसे मात्र नाही जमले कोणालाच. 

त्यानंतर आमची रवानगी अंगणात केली जायची आणि आजी,आई अन काकी लक्ष्मी पूजनाची तयारी करायला लागायच्या. घरातील सोन-नाणे देवापुढे ठेवून आजी लक्ष्मी जप करत पूजा मांडायची. मनोभावे आम्ही सर्वच त्या पूजेत रमून जायचो त्यावेळी आमच्या कडे रेकोर्ड प्लेयर होता. त्यावर ठराविक देवांच्या गाण्यांच्या रेकोर्ड लावल्या जायच्या. एकूणच घरातील वातावरण फार मस्त प्रसन्न असायचे आणि पाहुण्यांची ये-जा तर सततच सुरु रहायची. 

पुढचे दिवस बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीतील पाडवा; या दिवसाची आजीची पूजा पाहण्या सारखी असायची. आजी बळी राजाचे राज्य कणकेने तयार करायची. हत्ती,घोडे,रथ,राजा-राणी अन त्याचे सैन्य पाटावर उभे करून त्याची यथासांग पूजा करायची. त्यावेळी मी आणि दीपा आजीला खूप प्रश्न विचारायचो आणि आज्जी प्रत्येक वेळी त्या बली राजाची गोष्टही सांगायची परंतु तेव्हा त्यातील इतका खोल अर्थ आम्हीत नसे. आता मात्र ते सगळे जसेच्या तसे मला आठवते आहे. 
 
पूजा झाली कि आजी आजोबांना पाटावर बसवून ओवाळणी करायची आणि आजीला त्या दिवशी काहीना काही भेट आजोबा हाती द्यायचेच. तसेच आई-पपा आणि काका-काकी हि करायचे. आम्हाला त्यावेळी इतकी मजा यायची आणि काय चाललेलं आहे याची कुतूहलही असायचे. मी साधारण तिसरी-चौथीत असीन आणि दीपा माझ्या पेक्षा दोन तीन वर्षांनी लहान परंतु त्या सगळ्या गोष्टी ते बंगल्यातील    क्षण मला अजूनही स्पष्ट आठवतायत अगदी आत्ता झाल्या सारखेच. 

पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज, जी कायमच आमच्या बंगल्यात साजरी केली जायची. खूप खूप जण यायचे त्या दिवशी आजीचे तीन भाऊ, माझे मामा, दीपचे मामा, माझे अन दीपाचे भाऊ. पूर्ण बंगला गजबजून जायचा कधी कधी आजोबांच्या बहिणी म्हणजे आमच्या आत्या आज्जी सुद्धा यायच्या. सगळ्यान कडून काय काय भेटवस्तू मिळणार याबद्दल एक वेगळेच आकर्षण असायचे. 

मला माझी भाऊबीज खूप खास वाटायची कारण माझा दादा म्हणजे मावशीचा मुलगा त्याला स्वतःला सख्या तीन बहिणी असूनही खास माझ्यासाठी विरारहून ट्रेन मधून गर्दीतून काहीही करून न चुकता    यायचाच. त्यांनी आणलेल्या गिफ्ट कडे माझे लक्ष कमी आणि तो आवर्जून येतो याचे कौतुक मला जास्त असायचे. 
 
अश्या या दिवाळीच्या लहानपणीच्या आठवणी तुमच्या सोबत शेयर कराव्याश्या वाटल्या. त्या नंतरच्या हि खूप आठवणी आहेतच पण या अगदीच बाल मनातल्या लपून राहिलेल्या आठवणी आहेत यांना वाट मोकळी करावीशी वाटली. 
 

आत्ता पाहूया दिवाळीचा पाडवा अन भाऊबीज याचे मला वेगवेगळ्या सोशल साईट्स वरून मिळालेल्या माहिती एकत्र संकलित करून  लिहिण्याचा हा छोटा प्रयत्न केला आहे. 


दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे बलीप्रतिपदा; या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी (दसरा) हे पूर्ण मुहूर्त असून . साडेतीन मुहुर्तांना ईश्‍वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्त्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात.

आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजअसायची न करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल,अक्षता वाहून त्यांची पूजा होते.

या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले! बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले. बली हा दुष्ट असुर होता, शेतकरी नव्हता.तो राजा होता अन त्याला विष्णूच्या वामन अवताराने मारले शेतकऱ्यांचा राजा बळी आणि श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम; बलराम आणि बळी या दोन शब्दात खूप फरक आहे ल आणि ळ चा बलराम हे शेतकरी लोकांचे प्रतिनिधीत्व करतात त्याची हत्यारेसुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत. म्हणूनच "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे! ती फक्त बळीराजा साठी आहे.

या दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांच्‍या शिंगांना रंग लावून व त्‍यांच्‍या गळ्यात माळा घालून त्‍यांना सजवतात. मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. काही ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत मशाली घेऊन नाच करण्याचीही प्रथा आहे. त्या आनंदोत्सवाचे हे महत्त्वाचे अंग मानले जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.बळीची पूजा करताना जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा व पुढील मंत्राने बळीची प्रार्थना करावी, असे सांगितले आहे –

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो | भविष्येन्द्रासुराराते पूजेयं प्रतिगृह्यताम् ||

अर्थ – विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बळीराजा, तुला नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असूरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर.

त्यानंतर बळीप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात.

पूर्वी, बलिप्रतिपदेच्या पहाटे घरातील एखादी व्यक्तीे सर्व घर झाडून स्वच्छ करी. मग सगळा केर एका टोपलीत जमा करून त्या टोपलीवर जुनी केरसुणी, एक पणती व पैसा-सुपारी ठेवण्यात येई. ती टोपली घरातील प्रत्येक खोलीपुढे ओवाळली जाई. 

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा- फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात व मिरवणूक काढतात. ती पर्वतपूजा केली नाही, तर कार्तिकमासातील सर्व कृत्ये निष्फल होतात, असे सांगितले आहे.



पूर्वी गावागावांमध्‍ये बलिप्रतिपदेच्‍या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्‍ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. 

बलीराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे तीन दिवस आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी, आश्‍विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते अन् धर्माचरण करणार्‍या व्यक्तींच्या घरी लक्ष्मी निवास करते. ‘हे तीन दिवस पृथ्वीवर बलीचे राज्य असेल’, असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला, तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. यावरून भगवंताची ‘तत्त्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व’ हे गुण प्रकर्षाने दिसून येतात.

गोवर्धनपूजा : या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.

आध्यात्मिक महत्त्व : गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्याच्यामध्ये ४ टक्के कृष्णतत्त्व असून श्रीकृष्णाची १० टक्के तारक आणि १० टक्के मारक शक्ती कार्यरत आहे. गोवर्धनपूजनाने एक प्रकारे गोपाळांचा प्रतिपाळ करणार्‍या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.


यावर्षी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे. दिवाळीतील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. 

या वर्षीची दिवाळी जरी आपण सगळ्यांनी थोडक्यातच आवरती घेतली असली तरी पुढच्या दिवाळीची जोरात तयारी आणि प्लानिंग आपण नेहमी प्रमाणे सुरु करूया एका सकारात्मक भावनेने आणि उत्साहाने वाट पाहूया येणाऱ्या दिवाळीची.

या नंतरच्या भागात मी आजीच्या पद्धतीने अन अम्झ्या सासरी केले जाते त्या तुळशी लग्नाची  माहिती लिहिणार आहे. 

आपले अभिप्राय कोमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा







No comments:

Post a Comment

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...