तुळशी विवाह

 


तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी जी एकादशीपासून करायचा पूजोत्सव अशी प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे, म्हणूनच तिला हरिप्रिया असेही म्हंटले जाते व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुलसी व्रत हे एक काम व्रत आहे. तुलसी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लागते .

तुळसीचे पान. एक त्रलोक्य समान, उठोनिया प्रात:काळी, वंदी तुळसी माऊलींनाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही’’अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

हिंदू धर्मा मध्ये तुळशीला पाप – नाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही  भारताच्या सर्व प्रांतात व सर्व प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे. बहुतांश हिंदू कुटुंबीयांच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णू चा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे एक व्रत मांडले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.

विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला ‘प्रबोधोत्सव’ असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुलसी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरुवात होते. 

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे. 

तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची / तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात व तिला छान असे सजवितात. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. 

तुळशीच्या चारी बाजूंनी उसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्री बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशी मातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्य लेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुस-या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वाना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो.  तुळशी जवळ बोर चिंच आवळा सितापळ कांदयाची पात ठेवतात. रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाहय़ा, कुरमुरे, उसाच्या गंडे-या देण्यात येतात. हा विवाह केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. ते व्रत तुलसीवनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले आहे. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे.

तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैवुंâठात जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.

हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असं म्हटलं आहे. ग्रीक भाषेतील ‘बेंझिलिकॉन’ हा तुळशीसंबंधीचा शब्द ‘राजयोग’ या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे, असे मानत असत.

तुळशीची आरती :

जय देव जय देवी जय माये तुळशी ।निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी। ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी।

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।


दंतकथा १ 

तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणात आहे. ती अशी की, जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योद्धा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती.

पुढे, देव व दैत्य यांच्यांत युद्ध होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली.

इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले. वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडलेल. त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.

विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेडय़ासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली.

तुलसी श्री सखी शिवे पाप हरिणी नारायण मनः प्रिये




No comments:

Post a Comment

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...