लहानपणापासूनच कुलदैवत, कुलस्वामिनी आणि कुलपुरुष यांचे महत्व आजी कडून कळले होते. त्यामुळे दरवर्षी देवाला जाणे, कुलास्वमिनीची ओटी भरणे ह्या गोष्टी माहेरी नियमित पणे केलेल्या मी पहिल्या होत्या. लग्न जमल्या नंतर आता आपली कुलस्वामिनी कोण आणि कुलदैवत कोण हेही मला जाणून घ्यायचे होते. साधारणपणे खंडोबा हे कुलदैवत बऱ्याच जणांचे असतेच पण आमचे म्हणजेच माझ्या सासरकडचे कुलदैवत काळभैरव आणि भैरीभवानी असल्याने; काळभैरव हे दैवत माझ्या आयुष्यात माझ्या लग्नानंतर आले. जसे माझ्या माहेरी खंडोबाची पूजा अर्चा केली जायची, एकविरा देवी आणि व्याघ्रम्बरी देवीची पूजा केली जायची तसेच सासरी सुद्धा काळभैरव आणि तुळजाभवानी देवीची पूजा -आराधना केली जाते. नेहमीच्या सवयी प्रमाणेच मला या देवते बद्दलही जाणून घेण्याची मला उत्सुकता होती; त्यामुळे मी देवतेचा फोटो किंवा पोथी शोधण्यास सुरवात केली. माझ्या सासरी वर्षातून एकदा काळभैरव जयंतीनिमित्त कुलदेवतेला जायची प्रथा होतीच; पण लग्नानंतर नवीन जोडपे देवाला घेऊन जातात तसेच संगमेश्वर येथील कालभैरव आणि भैरी भवानीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो, पहिल्यांदीच मी या देवतेच्या मंदिरात जाणार होते. शिव-शंकराचे हे उग्र रूप आहे हे त्याच्या नाव वरूनच लक्षात आले होतेच. त्यामुळे एक वेगळेच दडपण माझ्या मनात होते.
आमचे गाव गुहागर जवळील अंजनवेल आणि संगमेश्वर येथे असलेले भैरीभवानीचे मंदिर हे आमचे कुलदैवत. मंदिर परिसर फार जुन्या वाड्या आणि जुन्या ठेवणीच्या घरांनी वेढलेला आहे. जवळच रहाणाऱ्या गुरवान ( गुरुजी) कडे आम्ही फ्रेश झालो आणि समोरच असलेल्या मंदिरात प्रवेश केला. नारळी-पोफळी आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेला हा परिसर, मस्त गार वारा आणि मंदिराच्या पाठी असलेल्या झऱ्याचा हळुवार आवाज लहान मुलांप्रमाणे निरव शांततेत अल्लडपणे बाधा आणत होता. आम्ही त्याच झर्याच्या पाण्यात पायावर पाणी घेतले आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. नेहमी प्रमाणे आपण मंदिरातील घंटा वाजवून आत शिरतो तसेच येथेही केले गेले. मंदिरातील प्रसन्न वातावरण, धुपाचा सुगंध आणि नुकतीच पूजा आवरल्याने टवटवीत फुलांनी सजवलेले देव फारच नयनरम्य वातावरण होते. माझ्या आई-पपांनी मनोभावे पूजा केली ओटी भरली आणि हाताची ओंजळ करून माझ्या लेकीला आपल्या ओटीत घातली आहे तिचा सांभाळ करा देवा असे म्हणताच काळ भैरवाच्या डोक्या वरील लाल चुटूक जास्वंदीचे फुल टपकन माझ्या पप्पांच्या ओंजळीत पडले.
मी नेहमीच म्हणते "जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दयाघना" हे मला त्या दिवशी मनोमनी पटले. आणि त्या दिवसा पासून आज तागायत देव माझ्या पाठीशी सदैव रक्षणासाठी उभे आहेत याची प्रचीती ते वारंवार देत्तात. हा माझ्या मनातला भाव तुमच्या सोबत काळभैरव जयंती निमित्त शेयर करावासा वाटला.
पाहूया कालभैरव देवाची माहिती आणि महती ज्याची माहिती मी थोडी माझ्या जवळ असलेल्या पोथीतून व काही माहिती सोशल साईट वरून गोळा करून संकलित केली आहे.
भैरव मंदिर अनेक ठिकाणी असते, मंदिर नसले तरी एखाद्या मंदिराच्या बाह्य भिंतीवर भैरव असतोच.
भैरव म्हणजे भरण करणारा किंवा भीषण. शिवाच्या रौद्र प्रकाराचेच हे एक रुप. याला अनेक नांवानी संबोधतात बहिरोबा, भैरोबा असेही म्हणतात. क्षेत्रपालही म्हणतात. हा काशीचा अधिपती व रक्षक आहे असे मानतात.
पुराणात आलेली यासंबंधी कथा :
शिव महापुराणाच्या आधारे असे संगतात कि, भगवान विष्णु आणि ब्रह्मा याच्यात संवाद चालला असता ब्रह्मा म्हणाले के, मीच या सृष्टीचा कर्ता असून सर्व देवांनी माझीच स्तुती करावी. हे ऐकून भगवान शिवांना क्रोध आला, आणि त्यांनी काळभैरवाची, ब्रह्माला शासन करण्यासाठी, उत्पत्ती केली. ब्रह्माच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक काळभैरवाने उडवले. आणि तेव्हापासून ब्रह्माला चारच डोकी आहेत. परंतु ते कापलेले मस्तक भैरवाचेच मस्तक आहे असे दिसू लागले, आणि त्याला ब्रह्माच्या शिरच्छेदाबद्दल अपराधी भावना वाटू लागली. आणि त्यामुळे कित्येक युगांपर्यंत, तो पर्यंत पापमुक्त होत नाही, तो पर्यंत काळभैरव ते मस्तक वाहत होते. ब्रह्महत्येचे पाप धुवायचे तर तिर्थाटन केले पाहिजे. शिवाने बारा वर्ष कापालिक व्रत केले. बारव्या वर्षी तो काशीस पोचला तेव्हा त्याच्या हातातून ब्रह्मदेवाचे कपाल गळून पडले. म्हणूनच काशीस कपालमोचन असे ही म्हणतात.
दुसरी एक कथा अशी सांगतात के, देवांचा राजा दक्षची कन्या सतीने मनोमन
भगवान शिवालाच आपला वर मानले होते, आणि विवाह केला, परंतु हे दक्षाला मान्य नव्हते, कारण शिव स्मशानात राहतो, अंगाला प्रेतभस्म लावतो, ध्यान विचित्र आहे, आणि सोबत भुते असतात. नंतर जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ केला तेव्हा त्याने शिव सतील बोलावले नाही. परंतु सती न बोलावताहि यज्ञाला आली, परंतु दक्ष शिवाला दुषणे देउन, अर्वाच्य भाषेत शिव्याशाप देऊ लागला, हे सहन न होऊन सतीने तिथ्व्च प्राणत्याग केला. हे पाहून शिवाला अतिशय दुःख झाले, आणि त्याने रागाने यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्षाचा वध केला. दुःख अनावर झाल्याने, शिव सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन त्रिलोकात फिरु लागला. आणि यामुळे सृष्टीचा नाश होऊ लागला. ते पाहुन भगवन विष्णुने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले, तेव्हा हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या रक्षणासाठी शिवाने काळभैरवाची उत्पत्ती केली, म्हणुन त्या त्या ठिकाणी काळभैरवाचे मंदिर असतेच.
पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात. शैव आगमांनुसार एकूण चौसष्ठ भैरवांचे आठ वर्ग असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना ‘अष्टभैरव’ म्हणतात.
अष्टभैरवांच्या नावांविषयी बरेच मतभेद आहेत. संहार वा महासंहार, असितांग, रूरू, काल, क्रोध, ताम्रचूड, कपाल, चंद्रचूड, रुद्रभैरव, चंड, उन्मत्त व भीषण या नावांपैकी वेगवेगळ्या आठ नावांचा अष्टभैरवांत समावेश केला जातो. विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लम्बित, देव, उग्र व विघ्न या प्रत्येकाला शेवटी ‘राज’ हे पद जोडूनही ही यादी केली जाते.
हिंदू पंचांग नुसार ‘काल भैरव जयंती’ प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. या दिवसाला ‘कालाष्टमी’ देखील म्हणतात. शास्त्रात नमूद केलेल्या कथांनुसार शिवरूपी भगवान ‘काल भैरव’ यांचा जन्म याच तिथीला झाला होता. काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान काल भैरव यांची प्रार्थना करण्याचे काही विशेष विधी आहेत. या खास दिवशी काल भैरवाची पूजा केली गेली, तर ते भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात, असे म्हटले जाते.
भगवान विश्वनाथ हे काशीचे राजा आहे आणि कालभैरव या नगरचे कोतवाल मानले जातात. म्हणून ह्यांना काशीचे कोतवाल म्हणतात. ह्यांच्या दर्शनाच्या शिवाय बाबा विश्वनाथाचे दर्शन करणे अपूर्ण मानतात. म्हणून नेहमी बाबा विश्वनाथाचे दर्शन केल्यावर कालभैरवाचे दर्शन करावे. काळ देखील ह्यांना भिऊन असतो. म्हणून यांना कालभैरव आणि हातामध्ये त्रिशूळ, तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंडपाणी देखील म्हणतात. ह्यांची पूजा केल्यानं घरातील नकारात्मक शक्ती, जादू-तोटके, भूतबाधा असे कोणत्याही प्रकारचे भय होत नाही तर यांची पूजा केल्यानं माणसाचा आत्मविश्वास वाढतो.
अतिशय जागृत देव आहेत हे यांचे रूप जरी उग्र असले तरी त्यांच्या निस्सीम भक्तांच्या पाठी ते एखद्या रक्षण कर्त्या प्रमाणेच उभे असतात.
त्यांच्या साठी भूत्नाथांच्या आरतीतील एक ओळ आठवते
उग्र हे रूप तुझे भूता खेतान्सी वाटे
भक्तांच्या काजा येत माय माउली प्रगटे
कालभैरवाय नमः
॥ अथ ध्यानम ॥
ॐ वाराणस्यां भैरवो देवः । संसारभयनाशनः ।
अनेक जन्मकृतं पापम् । स्मरणेन विनश्यति ॥
श्री गणेशाय नमः । ॐ नमः । सिद्धम्।













