माळ सातवी
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते॥
जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणि।
जय सर्वगते देवि कालरात्रि नमोस्तु ते॥
आजच्या नवदुर्गेतील नाव आहे कालरात्री. या देवीच्या प्रत्येक
श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन
आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वाना वर प्रदान करते. उजवीकडील
खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या
हातात खड्ग (कटय़ार) आहे. कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु ती
नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’सुद्धा
आहे. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच
घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे, असे मानतात. या देवीचे भक्त
पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे. मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी
असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि
नारायणि नमोऽस्तु ते ।।
अश्विन शुद्ध षष्टी पासून बंगाली लोकांचे दुर्गा पूजन आणि देवीचा
उत्सव सुरु होतो. दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे. सुमारे
एक हजार वर्षे बंगालमध्ये हा उत्सव चालू आहे असे मानले जाते. दुर्गापूजेच्या
प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुज मूर्ती बनवितात. तिचे रूप सिंहारूढ
महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या
मूर्ती असतात. देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या
बाजूला स्थान दिलेले असते. दुर्गापूजेच्या उत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध पंचमीला
होते. त्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे
आवाहन करतात. षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात. यात देवीच्या
निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य
आणतात. सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा इ. नऊ प्रकारच्या
पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजिता वल्लीने बांधतात. मग त्या जुडीला स्नान
घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू (कदलीवधू) असे म्हणतात. ती गणपतीची पत्नी असते.
उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात. त्यानंतरचा
महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा होय. त्यावेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि
त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते,
त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात. देवीच्या स्नानासाठी थंड
व उष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले, पंचगव्य, पंचामृत, आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र इ. ठिकाणची
माती आणतात. त्यानंतर देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात. मग तिला पशुबळी
देतात. पूर्वी हे बलिदान फार मोठ्या प्रमाणावर होत असे, पण सांप्रत त्याचे प्रमाण
घटले आहे. अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात. याशिवाय संधिपूजा नावाची एक
विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात.
बंगालमधील तारिकपूर भागात ही प्रथा सुरू झाली. बंगालमधून ही प्रथा
बनारसला व आसामलाही पोहोचली. तिथून इ.स.१९११मधे दिल्लीत ही पूजा सुरू झाली. सुरुवातीला
बांधकाम करणारे गवंडी, सुतार
वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण
होता, पण
सांप्रत त्याला सामाजिक स्वरूप आले आहे.
गृहस्थ सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात.
मग सपत्नीक बसून देशकालोच्चारपूर्वक पूजेचा संकल्प करतात. मग गणपतीपूजन, स्वस्तिवाचन इ. करून
मातीच्या वेदीवर एका कलशाची स्थापना करतात. मग षोडशोपचारे पूजा करतात. दुर्गेजवळ
अखंड दीप तेवत ठेवतात. नंतर दुर्गास्तोत्राचा पाठ करतात. दुर्गेवर फुलांची माळ
बांधतात. नंतर एका कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन घालतात, ब्राह्मण भोजनही घालतात. बंगालमधील अनेक लोक
दुर्गेला आपली कुलदेवता मानून तिची नित्य पूजा करतात. ते तिला दुर्गतिनाशिनी
म्हणतात. पुराणांत व अनेक तंत्रग्रंथांत दुर्गापूजेचे महत्त्व वर्णिले आहे. अशा
प्रकारे दुर्गापूजा घरगुती पातळीवर साजरी केली जाते.
बंगालमध्ये कालीची उपासना प्राचीन कालापासून प्रचलित आहे.
पूर्णानंदांचा श्यामारहस्य आणि कृष्णानंदांचा तंत्रसार हे दोन ग्रंथ सुप्रसिद्ध
आहेत. या पूजेत सुरा (मद्य) ही अत्यावश्यक वस्तू मानली आहे. मंत्राने शुद्ध करून
तिचे सेवन केले जाते. कालीपूजेसाठी वापरले जाणारे कालीयंत्र त्रिकोण, पंचकोन किंवा नवकोन करावे, असे कालिकोपनिषदात सांगितले
आहे. काही वेळा ते पंधरा कोनांचेही करतात. कालीपूजा कार्तिक कृष्णपक्षात, विशेष करून रात्रीच्या वेळी
फलप्रद सांगितली आहे. या पूजेत कालीस्तोत्र, कवच, शतनाम
आणि सहस्रनाम यांचा पाठ विहित आहे.
देवीने आवश्यकेनुसार विविध अवतार धारण केले, उदा. दुर्गमासुराला नष्ट करण्यासाठी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींचे संयुक्त तत्त्व दुर्गादेवीच्या रूपाने अवतीर्ण झाले. पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींच्या एकत्रित तत्त्वातून वैष्णोदेवीचा अवतार साकार झालेला आहे.’ (कु. मधुरा भोसले यांना ज्ञानातून मिळालेली माहिती) महालक्ष्मीदेवीने श्रीविष्णूच्या रामावताराच्या वेळी सीता आणि कृष्णावताराच्या वेळी रुक्मिणी यांचा अवतार धारण केला होता. महिषासुराला नष्ट करण्यासाठी पार्वतीने महिषासुरमर्दिनीचा अवतार धारण केला.
अन्नपूर्णादेवी : पार्वतीमातेने शिव, गणेश, कार्तिकेय आणि शिवगण यांची भूक शमवण्यासाठी अन्नपूर्णादेवीचे रूप धारण करून पक्वाने बनवली. याच अन्नपूर्णादेवीचा वास प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकघरात सूक्ष्मातून असतो.
शताक्षी आणि शाकंभरीदेवी : ‘दुर्गमासुर’ नावाच्या
असुराचा विनाश करण्यासाठी देवीने धारण केलेल्या श्रीदुर्गादेवीच्या रूपातून ‘शताक्षी आणि शाकंभरी’, या उपदेवींची निर्मिती
झाली. दुर्गमासुराने वेदांना पाताळात नेऊन ठेवल्यामुळे सर्वत्र धर्मज्ञानाचा लोप
होऊन अधर्म बळावला. त्यामुळे अनावृष्टी होऊन सर्वत्र दुष्काळ पडला. दुष्काळामुळे
पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या जिवांना पिण्यासाठी पाणी देण्याकरता देवीचे ‘शताक्षी’ हे रूप कार्यरत झाले. या
रूपात देवीच्या शंभर नेत्रांतून वहाणार्या अश्रुधारांमुळे पृथ्वीवर विविध
नद्यांची निर्मिती झाली आणि दुष्काळाचे संंकट टळले. भक्तजनांची भूक शमवण्यासाठी
त्यांना ‘शाक’, म्हणजे वनस्पती मिळाव्यात
यासाठी देवीचे ‘शाकंभरी’ हे रूप कार्यरत झाले.
अशाप्रकारे देवीच्या ‘शताक्षी
आणि शाकंभरी’, या
रूपांनी भक्तांवर आलेल्या आसुरी संकटाचे निवारण केले.
गंगा इत्यादी विविध नद्यांच्या रूपातील देवी. हिंदु धर्मात जलाधिपती म्हणून वरुणदेवाचे वर्णन केले आहे. या जलाचे विराट रूप असणारा सागर समुद्रदेव म्हणून ओळखला जातो आणि विविध नद्या या देवीच्या रूपाने ओळखल्या जातात, उदा. गंगानदी, नर्मदानदी, यमुनानदी इत्यादी.
गोमाता : हिंदु धर्मानुसार गायीला केवळ दूध देणारा प्राणी न मानता गोमाता मानले आहे. गायीच्या उदरात ३३ कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे हिंदूंसाठी गोमाता पूजनीय आहे.
कुलदेवी : प्रत्येक मनुष्य ज्या कुळात जन्माला येतो, त्या कुळाची एक प्रमुख देवी
किंवा देव असतो. कुलदेवीच्या कृपेमुळे कुळाला ऐहिक आणि पारमार्थिक लाभ होतो. ती
कुळाचे रक्षण आणि कल्याण करते. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी तिच्या दर्शनाला
जाणे, तिच्या
वार्षिक उत्सवात सहभागी होणे आणि तिचे नामस्मरण करणे, अशी उपासना प्रत्येक
हिंदूने करणे
धरणी म्हणजे केवळ ग्रह नसून ती ‘धरणीमाता’ आहे.
तिला ‘भूदेवी’ असेही संबोधले जाते.
श्रीविष्णूच्या श्रीदेवी आणि भूदेवी या दोन पत्नी आहेत.
संबंधित तीर्थक्षेत्र, शक्तीपीठ किंवा जागृत देवस्थाने
‘उत्तरेतील
जम्मू येथील श्री वैष्णोदेवी आणि शारदादेवी, आसाम मधील कामाख्यादेवी, आंध्रप्रदेशमधील बोधन अन् बासर येथील श्री सरस्वतीदेवी, तमिळनाडूतील कांची येथील
कामाक्षी, मदुराई
येथील मीनाक्षी आणि कन्याकुमारी येथील कन्याकुमारीदेवी, कर्नाटकातील म्हैसुरू येथील
चामुंडा, सौंदती
येथील रेणुका, अल्लुक्का, मरिय्यम्मा, मुकांबिका, दुर्गापरमेश्वरी अन्
महाराष्ट्रातील माहूरची रेणुका,
तुळजापूरची भवानीमाता, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगीदेवी, गोव्यातील शांतादुर्गा, गुजरात मधील अंबामाता, बंगालमधील कालीमाता आणि तारा, झारखंड राज्यातील छिन्नमस्तिका इत्यादी देवींची मंदिरे सुप्रसिद्ध
आहेत.
कलकत्ता येथे दुर्गेचे शक्तिपीठ असून तेथे दुर्गेला काली म्हणतात.
आसाममधील कामाख्या हेही एक शक्तिपीठ आहे. या देवतेच्या उपासनेची आणि पूजापद्धतीची
माहिती कालिकापुराणात सांगितली आहे. बंगालमधील या उत्सवासाठी मंदिराबाहेर दुर्गेची
सिंहारूढ मूर्ती बसवितात. तिचे रूप महिषासुरमर्दिनीचे असते. आश्विन शुद्ध
प्रतिपदेपासून पहिले चार दिवस देवीची सजावट करतात. पाचव्या व सहाव्या दिवशी देवीला
आवाहन करून तिची षोडशोपचार पूजा करतात. सात, आठ, नऊ हे
दिवस अत्यंत महत्त्वाचे मानतात. दहाव्या दिवशी देवीला असंख्य पशुबळी अर्पण करतात.
काली ही रुधिरप्रिया आहे. देवीची पूजा करून तिला मिरवणुकीने मंदिरात आणतात.
उत्सवमूर्तीचे विसर्जन करतात. या काळात दुर्गा माहेरी आलेली आहे, अशी समजूत असल्याने
स्त्रिया आपापल्या माहेरी जाऊन हा उत्सव साजरा करतात.
नेपाळमध्येही दुर्गापूजेचा उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस होतो. नवव्या दिवशी शस्त्रांची आणि ध्वजांची पूजा करून देवीला रेड्याचा बळी दिला जातो. बळी दिलेल्या पशूच्या रक्तात हात भिजवून ध्वजांना ते रक्त लावण्याची प्रथा तेथे रूढ आहे.
उत्तर भारतात, विशेषतः
बंगाल–आसाममध्ये
दुर्गा ही तांत्रिकांची देवता मानलेली आहे. त्यामुळेच मंत्रतंत्र, पशुबली इ. गोष्टीना या
उत्सवात विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जातिजमातींमध्ये दुर्गापूजा केली जाते.
प्राचीन शबर जमातीतील या उत्सवात जागरण व नृत्य करीत आणि पशूंना बळी देत. देवीला
दिल्या जाणाऱ्या पशुबलींच्या संदर्भात कालिकापुराणाने नरबलीचाही उल्लेख केला आहे.
बाणभट्टाने (सातवे शतक) आणि भवभूतीने (आठवे शकत) चंडिकेसमोर दिल्या जाणाऱ्या
नरबलीचा उल्लेख केला आहे, तसेच
हरिभद्रने (नववे शतक) समराइच्च कहा नावाच्या ग्रंथात शबरांनी कालीला दिलेल्या नरबळीचा
निर्देश केला आहे.
















