विजयादशमी - दसरा

 



विजयादशमी – दसरा

नवरात्र हा वर्षातील असा कालखंड आहे जो रंग, परंपरा, गायन आणि नृत्यांनी समृद्ध असतो. जे अध्यात्मिकतेचा शोध घेत आहेत त्यांना ही वेळ धार्मिक दृष्टया पवित्र आणि पूजनीय आहे. हि अशी वेळ आहे की आपण स्वत:ला जीवनातील इंद्रिय संवेदना आणि भौतिक सुखांपासून दूर नेऊन अध्यात्मिक प्रक्रियांमध्ये स्थिर करून अंत:सामर्थ्याचा निर्भेळ आनंदसंतोष आणि अगणित उत्साह जीवनात आणू शकतो आणि हे सर्व आपल्या बाह्य वर्तणुकीतून सहजतेने व्यक्त होऊ शकते, हे होईल जेंव्हा आपल्यामध्ये सत्व गुण वाढेल.

आज विजयादशमी बद्दल माहिती देण्या आधी नवरात्रीत केली जाणारी देवीची उपासना आणि त्या संबंधित संकलित केलेली माहिती लिहित आहे.

देवीशी संबंधित ग्रंथ

दुर्गासप्तशती, देवीपुराण, देवीभागवत हे देवीशी संबंधित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

देवीशी संबंधित स्तोत्र, अष्टक आणि कवच 

मंगल चंडिकास्तोत्र, श्री दुर्गास्तोत्र, श्री अन्नपूर्णास्तोत्र, श्री शताक्षीदेवीस्तोत्र, श्री लक्ष्मीस्तोत्र, श्री चंडिकवच (देवीकवच), श्री महालक्ष्मी अष्टक, श्री भवानी अष्टक, श्री सूक्त इत्यादी देवीशी संबंधित स्तोत्रे, अष्टक आणि कवच आहेत.

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम् ॥

अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे अन् मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यावे.

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

अर्थ : सर्व मंगल गोष्टींमधील मांगल्यस्वरूप, पवित्र, सर्व इच्छा साध्य करून देणार्‍या, सर्वांचे शरणस्थान असलेल्या, त्रिनेत्रधारिणी, हे गौरवर्णी नारायणीदेवी (पार्वती), मी तुला नमस्कार करतो.

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम : ॥

अर्थ : हे देवी, तूच सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने स्थित आहेस. आम्ही तुला पुन:पुन्हा नमन करतो.

सरस्वती गायत्री मंत्र

ॐ वाग्देव्यैच विद्महे । विरिंचिपत्न्यैच धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही वाग्देवीला (सरस्वतीदेवीला) जाणतो. आम्ही सरस्वतीचे ध्यान करतो. ती सरस्वती आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

ब्रह्माणी गायत्री मंत्र

ॐ देव्यै ब्रह्मण्यै विद्महे । महाशक्त्यै च धीमहि । तन्नो देवी प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही ब्रह्माणीदेवीला जाणतो. (त्या) महाशक्तीचे आम्ही ध्यान करतो. ब्रह्माणी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

लक्ष्मी गायत्री मंत्र

ॐ महालक्ष्मीच विद्महे । विष्णुपत्नीच धीमहि । तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही महालक्ष्मीला जाणतो आणि विष्णुपत्नीचे (महालक्ष्मीचे) ध्यान करतो. ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

दुर्गा गायत्री मंत्र

ॐ गिरिजायै विद्महे । शिवप्रियायै धीमहि । तन्नो दुर्गी: प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही गिरीजेला जाणतो आणि शिवप्रियेचे (दुर्गादेवीचे) ध्यान करतो. ती दुर्गा आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

सीता गायत्री मंत्र

ॐ जनकात्मजायै विद्महे । भूमिपुत्र्यैच धीमहि । तन्नो जानकी प्रचोदयात्।

अर्थ : आम्ही जनककन्या सीतेला जाणतो. आम्ही भूमीपुत्री सीतेचे ध्यान करतो. ती जानकी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

हे सरस्वतीबीज आहे, ‘क्रींआणि क्लींही कालीबीजे आहेत, ‘दूंहे दुर्गाबीज, ‘श्रींहे लक्ष्मीबीज आणि स्त्रींहे धूम्रभैरवीबीज आहे. अशाप्रकारे विविध बीजमंत्र विविध देवींशी संबंधित आहेत.

देवीचे प्रचलित नामजप : 

ॐ श्री दुर्गादेव्यै नम: ।’,  ‘ॐ श्री महालक्ष्मीदेव्यै नम: ।आणि ॐ श्री सरस्वतीदेव्यै नम: ।हे देवींचे नामजप प्रचलित आहेत.

यंत्र : देवीतत्त्व आकृष्ट करून त्यांचे प्रक्षेपण करणारी अनेक यंत्रे उपलब्ध आहेत. यांतील बरीच यंत्रे आद्य शंकराचार्य यांनी सिद्ध केलेली आहेत. नवार्णयंत्र, श्रीयंत्र, श्री महालक्ष्मी यंत्र, श्री सरस्वती यंत्र आणि श्री बगलामुखी यंत्र ही देवीशी संबंधित असणारी काही प्रमुख यंत्रांची नावे आहेत.

संबंधित यज्ञ : चंडीयाग, शतचंडी, नवचंडी, सहस्रचंडी, गायत्रीयाग, सरस्वतीयाग, राजमातंगीयाग, बगलामुखीयाग इत्यादी यज्ञ हे देवीशी संबंधित आहेत.

संबंधित व्रत : मंगळागौरी, जेष्ठागौरी, महालक्ष्मीचे व्रत, वैभवलक्ष्मीचे व्रत आणि सत्यंबा व्रत ही देवीशी संबंधित व्रते आहेत.

संबंधित सण : घटस्थापना, ललितापंचमी, सरस्वतीपूजन, महालक्ष्मीपूजन, दिवाळीतील लक्ष्मीपूजन, तुलसीविवाह हे देवीशी संबंधित सण आहेत.

संबंधित उत्सव : चैत्रातील गौरी उत्सव, पौषातील शाकंभरी नवरात्र आणि शारदीय नवरात्रोत्सव हे देवीशी संबंधित उत्सव आहेत.



गरबा खेळणे म्हणजे टाळयांच्या किंवा बहुधा लाकडी दांड्यांच्या लयबद्ध गजरामध्ये देवीची भक्तिरसपूर्ण गाणी म्हणणे. टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे हा उद्देश असावा. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते, अशी श्रद्धा आहे. टाळ्यांमुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. यामध्ये छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात आणि त्याभोवती गोलाकार नाचण्याची पद्धती अनुभवाला येते.गुजरातेत अशा प्रकारचा उत्सवपरंपरेने साजरा केला जातो. त्याला दांडिया (नृत्य) म्हणतात.


उपवास

शरीर शुद्ध करण्यासाठी केला जातो.विशिष्ट प्रकारच्या अन्नाचा विशिष्ट परिणाम शरीरावर होतो तसेच आपण सेवन केलेल्या अन्नाच्या प्रमाणाचा परिणाम सुद्धा शरीरावर होत असतो. उपवास म्हणजे शरीर शुद्ध करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि विशिष्ट प्रकारचे अन्न ग्रहण करणे होय.

शरीर आणि मन हे दोन्ही  जोडलेले आहे.म्हणून जेंव्हा शरीर उपवास करून शुद्ध होते तेंव्हा मन सुद्धा शुद्ध होते. आणि निर्मळ मन हे शांत आणि स्थिर असते.म्हणून या नवरात्रीमध्ये थोडी फळे व पाणी किंवा अल्प प्रमाणात,पचायला हलके अन्न खाऊन उपवास करून शरीराला हलके ठेवा आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या सर्वांचा मनावर कसा परिणाम होतो.

 उपवासाचे फायदे

आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय उपचार पद्धतींमध्ये उपवास हे एक पचनाची आग आणि भूक पुन्हा प्रज्वलित करणारे एक प्रभावी साधन मानले जाते.सर्वसाधारणपणे आपण सर्वजण  चांगली भूक लागण्याची वाट पहात नाही.जेंव्हा शरीर अन्न पचविण्यास तयार असते तेंव्हा ते भुकेच्या माध्यमातून दर्शवते.भूक लागण्याच्या आधी खाल्ल्यामुळे आपल्या पचन संस्थेवर ताण येऊन ती दुर्बल बनते आणि रोग प्रतिकारशक्ती कमी होते.उपवासामुळे आपली पचनक्षमता वाढते आणि ही आग आपल्यामधील सुस्ती आणि निरसता,जडत्व जास्त खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेले असते ते कमी करते.म्हणून उपवास केल्यानंतर आपल्याला टवटवीत आणि हलके वाटते कारण शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत आणि ताज्यातवान्या होतात.उपवास हे शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम उपचार आहे.

उपवासाचे फायदे फक्त शरीरिक पातळीवरच होतनसून त्यांचे सकारात्मक परिणाम आपल्या मनावर आणि भावनांवर देखील होतात.शरीर हे मनाशी जोडलेले आहे आणि मन भावनांशी.जेंव्हा शरीर उपवासाच्या माध्यमातून शुद्ध होते तेंव्हा मन सुद्धा शुद्ध, शांत, निर्मळ आणि शांत होते.

सर्व अध्यात्मिक प्रक्रिया उदा.ध्यान ,जप, उपवास, मौन इत्यादीने आपली सत्वाची पातळी उंचावते. जेंव्हा सत्व उंचावते तेंव्हा जीवनातील ज्ञान, सजगता, सृजनशीलता आणि आनंद वाढतो, कारण हे सर्व गुण सत्वाबरोबर येतात.म्हणून उपवास, जप, ध्यान इत्यादी करणे हे महत्वाचे आहे.ते जीवनातील गुणवत्ता उंचावून अधिक आनंद आणि समाधान देतात. उपवास केल्यामुळे शरीरातील सत्वाची पातळी आणखी उंचावते कारण आपली शरीर प्रणाली शुद्ध होते जिच्यावर आपण बरेच वेळा जास्त अन्न खाल्यामुळे ताण दिलेला असतो.

दसरा / दशहरा 

 आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे. म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत.

आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून सरा  या सणाला एकमेकांना वाटली जातात.

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण |
इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||

अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो.

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:असेच म्हटले जाते.

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

 

.

2 comments:

  1. छान स्तोत्र आणि माहिती

    सुप्रिया

    ReplyDelete
  2. मंत्र आणि उपवास याची छान सविस्तर माहिती

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...