शिक्षक.... मनातले

                                                

               गुरू ब्रम्हा गुरू विष्णु गुरू देवो महेश्वरा  

गुरू साक्षात परब्रम्ह तस्मिये श्री गुरवे नमः 

आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन निमित्त लिहाव म्हणून माझ्या नेहमीच्या जागी बसले, वही ,पेन,माझे डेस्क आणि गरम चहाचा कप; सुरवात नेहमी सारखीच सुचली...

आयुष्याचा ग म भ न गिरवायला ज्यांनी पहिले शिकवले ते म्हणजे माझे आई-वडील, काका-काकी, आज्जी-आजोबा यांना माझ्या कडून मानवंदना. खर तर हे नमन मी मनात रोजच करत असते. तसेच माझे सगळे शिक्षक; अगदी मोन्तेसारी पासून ते लास्ट एअर Bsc पर्यंतच्या सगळ्याच टीचर्सना मनापासून मानवंदना. 

सर्वात पहिले आपले गुरु,शिक्षक म्हणजे आई-वडील. त्या नंतर शिक्षक हेच आपले गुरू असतात; शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्य, सामाजिक बांधिलकी, शिस्त, एकमेकांना साहाय्य करणे तसेच एकमेकांच्या साहाय्याने काही कामे करणे, सामुहिक बळाचे महत्व आणि एकात्मता. या सर्वच गोष्टी आपण शालेय जीवनात शिकत असतो. ज्याचे सर्व श्रेय फक्त आपल्या शिक्षकांनाच जाते. आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. 

आपण पाहुयात या दिवसाची सुरुवात कुठून आणि कशी झाली. 




डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. १९६२  मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. साधरण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. भारतामध्ये सर्वात आधी १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. आपल्याकडे जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन असतो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. 

आज गुरु-शिष्य नात्याचे संदर्भही बदलले. मात्र अद्याप बदलले नाही ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करताना आपल्या विद्यार्थ्याला यशोशिखरापर्यंत पोहचविण्याचे शिक्षकांचे ध्येय . याचा अर्थ असा होत नाही की पूर्वीचे शिक्षक दर्जेदार नव्हते. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी आवश्यक अध्यापन पद्धतीचा त्यांनी स्वीकार केलेला असावा आणि त्यात काही गैरही नव्हते . समाज व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून शिक्षकाच्या भूमिका सद्यस्थितीला बदलत आहेत . मात्र आजही एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे या नात्याचे माहात्म्य, त्यातला जिव्हाळा. याच निमित्ताने  गुरू-शिष्याच्या नात्याचे विविध धागे उलघडण्याचा हा प्रयत्न.

आपल्याला शिक्षणाचे महत्व अगदी पुरातन काळा पासूनच माहित आहे. द्रोणाचार्यांच्या गोष्टी आपण लहानपणा पासूनच एकत आलोय; त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या गोष्टी हि आपण एकल्या ,वाचल्या आहेतच. प्रत्येक गुरु-शिष्यात आपण एक आदरयुक्त भीती किवा शिस्त, दरारा पहिला आहेच. या शिक्षकांमुळेच वक्तशीरपणा हि अंगिकारला जायचा. गुरुबंधून मध्ये हि एक चढाओढीची  चुरस असायची. 

त्यानंतर "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" असे हि विद्यार्थी अन शिक्षकांचे नाते पहिले गेले. आमच्या काळात  शिक्षक म्हटले की आठवते ती त्यांची छडी! विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर तर होताच पण तेवढीच भीतीही असायची. शिक्षकांसमोर बोलायचे कसे हा मोठा प्रश्न असायचा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मर्यादेतच राहावं अशी त्याकाळच्या शिक्षकांची भूमिका असायची. शिक्षकांना विद्यार्थ्यांनी प्रत्युत्तर करता कामा नये. असं कोणा विद्यार्थ्यांकडून झालंच की मग त्या विद्यार्थ्यांची खैर नसायची. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक आदरयुक्त अंतर होतं.

याच वेळेस Learn with Fun आणि Play way Method या प्रकारच्या पद्धती अवलंबल्या गेल्या. ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या नात्यातील जवळीक आणि मैत्री वाढू लागली . विद्यार्थी आपल्या मनातील प्रश्न आणि रोजच्या व्यवहारातील शंका हि शिक्षकां समोर मांडू लागले. शिस्त आणि जिव्हाळा यातील समतोल व्यवस्थित सांधला जाऊ लागला. त्यानंतर आलेल्या संगणक युगानेहि शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवले. शिक्षकांनाही याचे वेगळे प्रशिक्षण घेणे गरजेचे होऊ लागले. मुलां मधील Creativity पालक आणि शिक्षकां समोर येऊ लागली.

आजची शिक्षण पद्धती प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. एकसुरी अभ्यास, पुढे मुलाला/मुलिला इंजिनियरिंग/मेडिकलला घालायचे. (त्याच्या खालची कोणतीही पदवी खालच्या दर्जाची मानली जावी बहुतेक) एम बी ए, परदेशी पोस्ट ग्रॅज्युएशन करता यावं म्हणून पालक मुलांना आत्ता पासून त्या भयंकर 'रॅट रेस' मध्ये अक्षरश: ढकलून देतात. कारण आजच्या मार्कांवर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पुढच्या सगळ्या अ‍ॅडमिशन्स अवलंबून आहेत. पण या अशा 'बर्डनसम' पालकांच्या वागण्यामुळे मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावत चाललंय. तसेच काही पालक तर मुलांवर Extra Activities च्या नावा खाली वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेण्यास भाग पाडत असतात. त्यामुळे त्याचे हि मुलांवर असलेले दडपण शिक्षकांना दिसून येत असते.

 आत्ताच्या या लॉकडाऊनच्या काळात तर प्रत्येक स्तरावर सर्वच अचानकपणे बदलून गेले. मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आधी शिक्षकांची तारांबळ उडाली. कारण अचानक समोर आलेले हे एक प्रकारचे चलेंज होते; नव्हे  अजूनही आहेच. प्रथम स्वतःची गुगल मीट साठी तयारी आणि नंतर विद्यार्थ्यांना सिलाबस प्रमाणे एक एक धडे पूर्ण करून घेणे हे सगळे सोपं नाही. प्रत्येक वेळी घरी असताना ऑनलाईन क्लास्सेस ची वेळ साधणेहि कठीण असायचे. तरीही यात विद्यार्थी आणि शिक्षक यातील दुवा जास्त घट्ट होत जात आहे असेच दिसते. आता संगणकाची जागा मोबाईल आणि स्मार्टफोन घेत आहेत. निरनिराळ्या Aaps वरून विद्यार्थ्यंना आणि पालकांना सगळ्याच विषयांचे प्रशिक्षण घेता येऊ लागले आहे. यामुळे शिक्षकांनाही रोजच्या रोज या सगळ्या गोष्टींचे updates ठेवणे आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयांची माहिती मिळवणे गरजेचे झाले आहे. आता कित्येक गोष्टींचे प्रोजेक्ट्स तयार करणे आणि विद्यार्थ्यानकडून करून घेणे ह्याही गोष्टी शिक्षक अगदी सहजरीत्या करत आहेत.


शिक्षक आपल्याला योग्य ज्ञान देतात, मार्ग दाखवतात आणि समाजातील एक जबाबदार व्यक्ती बनवतात. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा महत्वाचा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून त्यांना भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपण सर्वानीच आपल्या शिक्षकांना मानवंदना दिली पाहिजे.

तसेच इथे अजून एक नमूद करावेसे वाटते ते म्हणजे आपण स्वतः सुद्धा स्वतःचे शिक्षक असतो. अनेक प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कसं सावरायचे, खंबीरपणे कसे उभ रहायचे. वाईट मार्गाने न जाता चांगल्या मार्गावर कसे चालायचे हे लहानपणी शिकलेले असतोच पण त्यावर कायम कसे रहायचे, कोणत्याही लोभात,मोहात न अडकता निर्मळ आयुष्य कसे जगायचे हे प्रत्येक वेळी आई-वडील आणि गुरु शिकवत नसतात ते आपल्याला आपलेच अनुभवातून शिकायला लागते. आपल्या आयुष्यभरात जे जे लोक भेटतात ते ते आपल्याला काहीना काही चांगल्या गोष्टी शिकवून जात्तात. त्या सर्वांनाच माझी आजच्या शिक्षक दिनी मानवंदना


आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा



4 comments:

  1. तुझ्या शिक्षकांना तू खऱ्या अर्थाने आज बक्षीस दिलेस.
    छान लेख

    ReplyDelete
  2. अगदी सविस्तर आणि पद्धतशीर पणे शिक्षकांविषयी आदर,प्रेम व्यक्त केले आहे

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...