ओणाम

 


मला या सणाबद्दलची खास आस्था म्हणजे आमच्या शेजारीच दोन मल्याळम family राहायच्या त्यांच्या मुळेच हा सण कसा साजरा करतात हे कळायचे. त्यांच्या त्या टिपीकल केरळी पांढर्या आणि सोनेरी बोर्डरच्या साड्यांचे तसेच अबोली अन मल्लिगे चे लांबलचक गजरे, कपाळावरचे गंध, कानातील मोठे झुमके गळ्यातील लक्ष्मी हार आणि पोवळ्याचे दागिने. त्यांचे सकाळीच लवकर उठून अयप्पा मंदिरात जाणे आणि दिवसभर आपल्याकडे जसे भजन - गाणी सणाच्या दिवशी लावली जातात तशी गाणी लावली जायची. लहानपणी त्यातील काही ओळी अर्थ न समजताच पाठ होऊन गेल्या होत्या. त्यांचे फराळाचे पदार्थ आणि दुपारचे केळीच्या पानावरील खास जेवण मला फार आवडायचे. त्यामुळे या सणाबद्दल आज थोडे लिहावेसे वाटले.

केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होते. ओणाम म्हंटल कि आठवत ते बोटीच्या शर्यती, पुकालाम म्हणजे मोठ्या मोठ्या फुलांच्या रांगोळ्या, विविध रंगांची फुलांनी सजवलेल्या या रांगोळ्या प्रत्येकाच्या दारा समोर दिसतात. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस तिरूवोणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो. ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात येतो.


ओणम हा सण १९६० पासून केरळ सरकार राज्यपातळीवर साजरा करू लागले आहे. या महिन्यात हा ‘पर्यटन सप्ताह’ आखला जातो. संपूर्ण राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. यानिमित्त विविध क्रीडाप्रकारांचे आयोजन केले जाते. ज्यात धाडसाची गरज असते असे पुरुषांचे खेळ- म्हणजे तळप्पंतू कळी (बलापाठोपाठ त्याचा कासरा धरून वेगाने धावणे), वळ्ळम्कळी (सरोवरे आणि नदीपात्रातील बोटींच्या शर्यती), पुलीकळी (वाघाच्या सोंगांचा खेळ) हे खेळ खेळले जातात. तर महिला कईकोट्टी कळी आणि तुंबी तुल्लाल (एक-दुसरीला टाळ्या देत फेर धरून केले जाणारे नृत्य) खेळतात.


दहाव्या दिवशी म्हणजे तिरूओणमच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यावर नवे कपडे घालून देवदर्शन करण्याची लोकांमध्ये लगबग असते. या सणाचे मुख्य आकर्षण असते मेजवानी. नाश्त्याला केरळमध्ये खास मिळणारी केळी उकडून खायला दिली जातात. त्याबरोबरच पिकलेल्या केळ्यांसह पापडम्चा खासा फराळ असतो. जेवणातील मुख्य पदार्थाबरोबर हेही पदार्थ वाढले जातात. या दिवसांत कोणाही मल्याळी माणसाच्या घरात पाहुणे म्हणून गेलो कि  कुरकुरीत खाऱ्या केळ्याच्या चिप्सबरोबर कॉफीच्या कपाने तुमचे मनापासून स्वागत होईल.

पूर्वीच्या काळी गावांत काही ठिकाणी झाडावर झोपाळे बांधले जात. हे झुले सुंदर फुलांनी सजवले जात. नाटकं, संगीत, जलसे यांचा या दिवसांत नुसता जल्लोष असतो. ओणमला चिकणमातीपासून अंडाकृती आकाराच्या विष्णूच्या मूर्ती बनवल्या जातात. तांदळाच्या पिठीचा वापर करून त्यावर नक्षी काढली जाते. माडाच्या काडय़ा या मूर्तीना टोचून त्यावर सुरेख फुलं खोचली जातात. अशा सजवलेल्या मूर्ती अंगणात, फुलांच्या रांगोळीच्या मधे ठेवल्या जातात. त्या दिवशी या देवाला तीन वेळा नवेद्य दाखवला जातो.


या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रह्लादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे. सण साजरा करण्यामागे केरळीय जनतेच्या मनात एक भावना आहे. असे म्हणतात की, केरळीय जनतेने बळीराजाच्या काळात सुवर्णयुग अनुभवले.

त्याकाळी राज्यात सर्वत्र सुख-शांतता नांदत होती. जनता प्रामाणिकपणे व्यवहार करीत असे. सर्वत्र सुबत्ता होती. दानशूरपणाबद्दल तिन्ही लोकांत प्रसिद्ध पावलेल्या बळीराजाला लोक खूप मान देत. त्याच्या दारी आलेला याचक विन्मुख होऊन कधीच माघारी जात नसे. राजाचा सर्वत्र उदोउदो चालला होता. राजाच्या पुण्याईने इंद्राचे आसन डळमळू लागले बळीराजाचे प्रस्थ एवढे वाढलेले पाहून इंद्र व इतर देव घाबरले. इंद्राच्या मनात मत्सर जागृत झाला. बळीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी मग देवांनी विष्णूला साकडे घातले. विष्णूने देवांची ही विनंती मान्य केली. 

बळीराजाचे महत्त्व कमी करण्यासाठी त्याच्या दानशूरपणाचा फायदा घेण्याची युक्ती विष्णूने योजली. त्याने वामनाचे रूप घेतले आणि तो बळीराजाच्या दारी याचक म्हणून उभा राहिला. राजाने विष्णूला एक साधारण अतिथी समजून त्याची यथासांग पूजा केली. त्यास काय भिक्षा पाहिजे, म्हणून विचारणा केली. बटूच्या रूपातील विष्णूने ‘मला पाय ठेवायला फक्त तीन पावलं जमीन पाहिजे,’ अशी मागणी केली. बळीने जरी वामनरूपातील विष्णूला ओळखले नाही तरी राजाच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या गुरूने- शुक्राचार्याने अंतज्र्ञानाने विष्णूला तात्काळ ओळखले आणि राजाला दानाचे उदक सोडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण राजा आपला धर्म कसा सोडणार? आता तर वचन दिले गेले होते. दानाचे उदक सोडल्यावर मात्र वामनाने आपले भव्य रूप प्रकट केले आणि सहज एका ढांगेत स्वर्गलोक व्यापला, दुसरे पाऊल पृथ्वीवर टाकले. आता आणखी कुठेच जागा न उरल्याने ‘तिसरे पाऊल कोठे ठेवू?’ असा प्रश्न त्याने बळीला केला. कुठेच जागा न उरल्याने बळीने नम्रपणे आपले मस्तक पुढे केले; आणि वामन रुपी अवतार घेतलेल्या विष्णूनी त्याला पातळ लोकात ढकलून दिले.

तरीही बळीराजाची भक्ती लक्षात घेऊन विष्णूने त्याला दोन वर दिले. एक- पाताळलोकाचे सार्वभौमपद त्याला बहाल केले. दुसरे- त्याच्या दरबारात द्वारपाल म्हणून स्वत: उभे राहण्याचे काम विष्णूने आनंदाने स्वीकारले. बळीचे त्याच्या जनतेवर असलेले प्रेम लक्षात घेऊन त्याला वर्षांतून एकदा तिरूओणमच्या दिवशी पृथ्वीलोकातील आपल्या प्रिय प्रजेला भेटण्याची परवानगीही दिली. त्या दिवशी बळीराजा आपल्याला भेटायला येतो, या समजुतीने ‘आम्ही तुझ्या राज्यात सुखी, आनंदी आहोत, आमची भरभराट झाली आहे,’ हे दर्शविण्यासाठी हा ओणम उत्सव मल्याळी लोक हर्षोल्हासाने साजरा करतात. 

शेवटच्या दिवशी घरोघरी मेजवान्या केल्या जातात. या दिवशी गावांत सजवलेल्या हत्तीची मिरवणूक काढली जाते. आपल्याकडे जसे होळीच्या दिवसांत सोंग घेऊन भिक्षा मागितली जाते, तद्वत केरळमधील काही खेडय़ांत ओणमच्या दिवसांत बळीराजाचे काल्पनिक रूप घेऊन मुलं दारोदारी फिरतात व भिक्षा मिळाल्यावर आशीर्वाद देतात. केरळमध्ये पूजनीय असलेल्या वामनाचे ‘त्रिक्काकरा’ हे मंदिर कोची शहरानजीक आहे. 

दहाव्या दिवशी मंदिर आवारातील ओणमचा ध्वज उतरवण्यात येतो. ध्वज उतरवण्याचा पहिला मान कोचीपासून १२ कि.मी.वरील त्रिपुण्णित्तुरा येथील देवळाला जातो. त्रिपुण्णितुरा ही पूर्वी केरळची राजधानी होती. येथील मंदिरातील ध्वज खाली आणल्यावरच सर्व ठिकाणचे ध्वज खाली आणले जातात.

हि माहिती मी वेगवेगळ्या लिंक्स वरून गोळा केली आहे आणि एकत्रित पणे तुमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

!!!! HAPPY ONAM !!!!




 

6 comments:

  1. खूप छान माहिती दिली आहे. मला इतके माहित नव्हते. धन्यवाद.
    अतिशय चांगला लेख.

    ReplyDelete
  2. सुंदर माहिती. षड्रिपूंनी देवांना सुद्धा ग्रासले होते. मत्सर
    पौराणिक कथा वाचून मनात कधी कधी नकारात्मक भावना निर्माण होतात. पण त्या कथा शेवटी.

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...