दीपअमावस्या
शुभंकरोती कल्याणम
आरोग्यम धनसंपदा l
शत्रूबुद्धी विनाशाय
दीपज्योती नमोस्तुते ll
दिव्या दिव्या दीप्तकार
कानीकुंडले गळा मोतीहार l
दिवा जळो तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवानं पाशी ll
ही प्रार्थना आपण सर्वांनीच लहानपणी तिन्हीसांजेला केली असेलच. संध्याकाळी प्रत्येक जण आपापल्या घरी परततात तेव्हा ही प्रार्थना म्हणायची; आपल्या संस्कृतीत प्रथा आहे.
प्रकाश हे ऊर्जेचे रूप आहे. जिथे प्रकाशाचे अस्तित्व नाही तिथे अंधार होतो. प्रकाश ही आपल्याला तिमिरातून तेजा कडे नेणारी ऊर्जा आहे.
ही प्रकाशरुपी ऊर्जा आपल्याला नैसर्गिकरित्या सूर्यदेव देतातच या उर्जेमुळेच भूतलावरील अंधःकार दूर होतो आणि सृष्टीत चैतन्य निर्माण होते. प्रत्येक पेशींना या प्रकाशरुपी ऊर्जेची गरज असते.
जसा दिवस मावळत जातो तसा प्रकाश कमी होत जातो आणि अंधार पडायला सुरुवात होते. यावेळी आपण दीप प्रज्वलित करतो ज्यामुळे अंधार दूर होण्यास मदत होते. याच दिव्यासाठी आपण प्रार्थना आणि पूजन करतो.
आषाढी अमावस्येला म्हणजेच दीपअमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व प्रकारचे दिवे धुवून त्यात तेलवात-तुपवात लावून, हळद-कुंकू अन फुलं वाहून पूजा करतात. या दिवशी गोड पदार्थ करून त्याचा नेवैद्य दाखवला जातो.घर उजेडाने, धनधान्याने, आनंदाने, सुख-समाधानाने भरून जाऊ दे अशी प्रार्थना केली जाते.
दीप सूर्याग्निरूपस्तवं तेजस तेज उत्तमम ।
गृहाण मत्वकृतां पूजा सर्व कामप्रदो भव ।।
अर्थात
हे दीप, तू सुर्यरूप व अग्निरूप आहेस.
तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस.
माझ्या पूजेचा तू स्विकार कर
आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
ईश्वराने आपल्या शरीरातील रचनेत एकच अवयव असा दिलाय की त्यातूनच आपल्या शरीरात प्रकाशाची किरणं आत प्रवेश करू शकतात.
ते म्हणजे आपले डोळे, आपली दृष्टी.
ज्यामुळे ईश्वराने निर्माण केलेली, विविधतेने नटलेली अन अनेक रंगानी सजलेली सृष्टी आपण पाहू शकतो आणि हे अवर्णनीय सौंदर्य अनुभवू शकतो.
ही दृष्टी म्हणजे दीप आणि आपलं शरीर म्हणजे घर असते; नाही का??
या दृष्टीला शरीरात तेवत ठेवता आलं पाहिजे.
या दृष्टी मार्गाने शरीरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेचे रूपांतर सकारात्मक करणे आवश्यक असते. आपले विचार शुद्ध आणि प्रसन्न असले पाहिजेत. यासाठी मन शांत आणि निर्मळ ठेवणे गरजेचे असते.
दृष्टीस पडते ते सर्वच आपण पाहतो पण त्यातले काय अंगीकारायचे ते आपल्यावर अवलंबून असते.
सृष्टीमध्ये संमिश्र म्हणजे चांगल्या-वाईट गोष्टी आहेत. देव आहे तिथे दानव आहे, सगुण तिथे अवगुण आहेच, पुण्य आहे तिथे पाप असतेच. त्यातूनच काय आत्मसात करायचे ते समजलं पाहिजे.
ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतही;
दिवस-रात्र आणि अमावस्या-पौर्णिमा होत असतात जिथे काही वेळा आपल्याला प्रसन्न वाटते तर काही वेळा आपल्याला उदासीन; हे सारे नैसर्गिक आहे.
प्रत्येक दिवशी आपल्याला डोळे उघडून हे जग पहायची संधी मिळते त्या प्रत्येक दिवसाकरता ईश्वराचे आभार मानले पाहिजेत.
चला तर मग आज दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करूया आणि आपल्या अंतर्मनातील दिव्याची ज्योत आपण सतत तेवत ठेवूया
सोनाली देवळेकर



अतिशय छान माहिती तरुण पिढीसाठी.
ReplyDeleteछान लिहिलं आहेस सोनाली आपल्या संस्कृतीबद्दल
ReplyDeleteछान माहिती...🙏🙏
ReplyDeleteसोनाली. आपल्या मुलांना शिकण्यासाठी खूप उपयुक्त माहीती आहे.
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteupyukta mahiti
ReplyDeleteखूप सुंदर आणि उपयुक्त माहिती सोनाली!!
ReplyDeleteखूप सुंदर आणि उपयुक्त माहिती सोनाली!!
ReplyDeleteखरंच खूप छान लिहिलंय तुम्ही. अतीशय उपयुक्त अशी माहिती जी मुलांना सांगायला थोडक्यात पण उपयुक्त ठरेल.👌👌👌👍👍👍
ReplyDeleteआपल्या सणांची माहिती देण्याचा हा उपक्रम खूप चांगला आहे. शुभेच्छा
ReplyDelete